अहमदनगर पॉलिटिक्स : शिवाजी कर्डीलेंवर लोकसभेची 'मोठी' जबाबदारी ; कसे असेल प्लॅनिंग... पहा...



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - नगर शहर, नगर तालुका, नगर-राहुरी मतदारसंघच नव्हे तर ग्रामपंचायत, सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा कोणतीही निवडणूक असोत यात विजयाचे गणित हे माजी मंत्री तथा अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले यांच्याभोवतीच फिरते हा इतिहास आहे. जिल्ह्याच्या राजकारणात शिवाजी कर्डीले यांचा दबदबा आजही कायम आहेत. ते आजच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत आहे. निवडणूक कोणतीही असो ती कर्डीलेंच्या आदेशाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अहमदनगर जिल्ह्यात तीन-चार पिढ्यानंपासून विखे, थोरात यांचा कायमच वरचष्मा  जिल्ह्याने पाहिला आहे. तसेच कर्डीले यांचे जिल्ह्यातील वलय आज पहावयास मिळत आहे. त्याची झलक जिल्हा बँकेच्या राजकारणात संपूर्ण राज्याने पाहिली. त्याच अनुषंघाने होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार विखे पाटलांची मोठी जबाबदारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले यांच्यावर असल्याचे दिसून येते.


अपक्ष असो वा हातात जो झेंडा असेल त्या पक्षाचे असो, शिवाजी कर्डीले आणि विजय हे समीकरण. मात्र 2019च्या विधानसभेत त्यांना पहिल्यांदा पराभवाची चव अपघाताने चाखावी लागली. मात्र असे असले तरी आजही जिल्ह्यातील भले-भले दिग्गज नेते शिवाजी कर्डीले यांच्या हातातील जादुई ताकत ओळखून आहेत. केवळ नगर तालुक्यातच नाही तर मतदार पुनर्रचनेट राहुरी विधानसभेचे भौगोलिक क्षेत्र बदलले तरी 2009 आणि 2014 ला ते लीलया निवडून आले. कर्डीलेंनी राजकारणाची ओळखलेली नाडी, प्रचंड जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि जोडीला असलेले नातेसंबंध !! या नाते संबंधावर नगर शहरातील महानगरपालिकेचे राजकारण असो वा कृषी उत्पन्न बाजार समिती असो.. मतदारसंघातील जिल्हापरिषदेचे गट, पंचायत समिती, आणि ग्रामपंचायती या सर्व ठिकाणी आपला खास “दबदबा” कसा ठेवायचा हे कर्डीले यांना चांगलेच माहीत आहे. एकूणच शिवाजी कर्डीले म्हणजे विजयाचा फॉर्म्युला हे समीकरण आणि म्हणूनच त्यांच्या कडे "किंगमेकर” म्हणून पाहिले जाते.


आता लोकसभा निवडणुकीत भाजपा नेते शिवाजी कर्डीले महायुतीतील नगर दक्षिण आणि शिर्डीची सूत्रे हलवत आहे. दोन्ही जागेवर महायुतीचे उमेदवार निवडणून आणण्याची आणि त्यासाठी लागणारी रणनीती आखण्याची जबाबदारी विखे परिवाराने शिवाजी कर्डीले यांच्या कडे दिल्याचे दिसून येत आहे. नगर शहर, नगर तालुका, राहुरी विधानसभा या ठिकाणी कर्डीले मोठी भूमिका बजावू शकणार आहे. या तीनही तालुक्यात कर्डीले यांचा कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. 

 नगर शहराचे आ. संग्राम जगताप, माजी महापौर संदीप कोतकर, शिवसेनेचे गाडे कुटुंबातील अमोल गाडे यांचे ते सासरे आहेत. शिवाजी कर्डीले गावचे सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले आहे. साहजिकच वेगवेगळ्या निवडणुकांचा पाया ते कळस कसा गाठून विजयश्री कशी आपल्याकडे खेचून आणायची याचे तंत्र त्यांना चपखल माहीत आहे.


एकूणच शिवाजी कर्डीले यंदा लोकसभेच्या निमित्ताने केवळ नगर दक्षिणच नव्हे तर शिर्डी मतदारसंघात किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहे.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपयश आले परंतु त्यांनी मतदाराशी असलेला जनसंपर्क आजही कायम आहे. आजही कर्डीलेंचा दरबार कायम भरलेलाच असतो. कार्यकर्त्यांचा लवाजमा कायम आहे. गेल्या तीन चार वर्षात विखे-कर्डीले यांचे सख्य चांगलेच जुळून आले आहे. त्याचीच बक्षीसी म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले असल्याचे बोलले जाते.


विखे-कर्डीले-जगताप-कोतकर एकत्र आल्याने त्यांची सहमती एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. एकजूट झाल्याने राजकीय दृष्टीने

सर्वांचा फायदा असल्याने विखे परिवाराने निवडणुकीत कर्डीले यांना चांगलेच ऍक्टिव्ह केले आहे. नुकतेच नगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित असताना कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिर्डीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे आवर्जून उपस्थित होते. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या महायुतीतील पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासर्व ठिकाणी शिवाजी कर्डीले केंद्रस्थानी दिसून आले. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, महायुतीचे फोटोसेशन, पत्रकात परिषद या नंतर विखे, कर्डीले, लोखंडे, कोते यांच्यातील बैठका. एकूणच लोकसभा निवडणुकीत विखेंनी शिवाजी कर्डीले यांच्यावर मोठी जबाबदारी टाकल्याचे बोलले जात असून या निमित्ताने कर्डीले पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.


कर्डीले का आहेत किंगमेकर...!

सलग पाच वेळा आमदार, बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघावर एक हाती वर्चस्व, जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा यामुळे राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा आहे. मोठी ताकत असल्याने भल्या भल्यांना घाम फोडण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. याचं ताकदीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, विखे पाटील यांच्या साथीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद त्यांनी खेचून आणले. राज्यातील बड्या नेत्यांना यांचा शेवटपर्यंत मागसूसही लागला नाही. विजयाचा निकाल हाती आला तर सर्वांनाच विजयाचा धक्का बसला. त्यामुळेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असल्याने, लोकसभा निवडणुकीचा अनुभव असल्याने कर्डीले जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post