मुंबई / नगर सह्याद्री -
राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील उष्णतेची लाट काहीशी ओसरली आहे. उकाडा तापदायक ठरत आहे. अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. मंगळवारी नोंदवण्यात आलेल्या अंदाजानु
सार, विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेचा प्रभाव अधिक दिसून आला आहे. तर संध्याकाळी राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. सांगली शहरासह मिरज तालुक्यात गारपीट झाली.
सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
याभागात मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागाने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहून विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. काढणीसाठी तयार असलेले कांदा,ज्वारी आणि गव्हाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
लातूर जिल्ह्यात आज सायंकाळी अवकाळी पाऊस झाला, तर यावेळी वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली आहे. जिल्ह्यातल्या औसा निलंगा लातूर या भागात अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांसह फळबागेच्या देखील मोठं नुकसान झालं आहे. पुढील तीन तासासाठी लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Post a Comment