जेऊर परिसरातील वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांची झाली दुर्दशा नागरिकांमध्ये संताप ; शेतकरी, दुग्ध व्यवसायिकांचे हाल

माय अहमदनगर वेब टीम 


 नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर परिसरातील अनेक वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांची दुर्दशा झाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्या अभावी शेतकरी, दुग्ध व्यवसायीक, तसेच शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.

     जेऊर परिसरातील नाईक मळा रस्ता, चापेवाडी- शेटे वस्ती रस्ता, लिगाडे वस्ती ते खारोळी नदी रस्ता तसेच अनेक वस्त्यांवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. वाहनेच काय पायी चालणे देखील अवघड बनले आहे.



     शेतकरी, दुग्धव्यवसायिक व शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तरीदेखील सदर रस्ते दुरुस्त करण्यात येत नाहीत. रस्त्याच्या समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत आहेत. रस्त्याच्या समस्यांची दखल कोणाकडून घेण्यात येत नसल्याने नागरिकांमधून चीड व्यक्त करण्यात येत आहे. दुग्ध व्यवसायिकांना तसेच शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणता येत नाही.

    शाळेतील विद्यार्थ्यांना मोठी कसरत करत शाळेत जावे लागत आहे. पावसामुळे सर्वत्र पाणी व चिखल झाला असून वाड्या वस्त्यावरील नागरिकांचे रस्त्या अभावी अतोनात हाल सुरू आहेत. तरी वाड्या वस्त्यांवरील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

_______________________________

 चापेवाडी शेटे वस्ती रस्त्याची दुर्दशा

 चापेवाडी ते शेटे वस्ती रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला असून रस्त्यावरून पायी चालणे देखील अवघड बनले आहे. वारंवार मागणी करून देखील रस्त्याचे काम होत नाही. शेतकरी, विद्यार्थी, दुग्धव्यवसायिक यांचे अतोनात हाल सुरु आहेत. 

..... रमेश लक्ष्मण पवार

_____________________________________

शेतकऱ्यांच्या वादात अडकला रस्ता

 लिगाडे वस्ती ते लक्ष्मी माता मंदिर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. अर्धा रस्ता पूर्ण झाला आहे परंतु दोन शेतकऱ्यांच्या वादात रस्ता अपूर्ण आहे. तरी तो रस्ता पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

__________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post