संपकऱ्यांसाठी मदतीचा हात; एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरसावले मुंबईकर

 


मुंबई | आभाळाचे छत आणि जमिनीचे अंथरूण, भुकेला चटणी- भाकरी आणि तोंडी विलीनीकरणाची मागणी... ही स्थिती आहे सर्वात मोठ्या प्रवासी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची, अर्थात एसटी कर्मचाऱ्यांची. गेल्या सात दिवसांपासून राज्यातील विविध आगारातील कर्मचारी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.


मागील आठवडाभर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात ठाण मांडले आहे. सूर्योदयानंतर पहिल्या किरणाने संपकरी कर्मचाऱ्यांचा दिवस सुरू होतो. मुंबईकरांच्या, सेवाभावी संस्थांच्या मदतीने आणि नेत्यांच्या आश्वासनांवर दुपार होते. संध्याकाळी मैदानाबाहेरील वडापाव खाऊन दिवस मावळतीला येतो. मेट्रोकामाच्या साक्षीने दिवस संपतो...

एसटी महामंडळाच्या पनवेल, कुर्ला, नाशिक, लातूर, नांदेड, परभणी, अक्कलकोट, सोलापूर या आणि अन्य आगारातील एसटी कर्मचारी 'एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा', या मागणीसाठी मैदानात ठाण मांडून बसले आहेत. रणरणत्या उन्हात आझाद मैदानातील झाडाझुडुपांच्या सावलीत हे कर्मचारी मागणी पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तरुण, महिला, निवृत्तीकडे झुकलेले ज्येष्ठ कामगार असे सर्वच वयोगटातील एसटी कर्मचारी या उपोषणात सहभागी झाले आहेत. उपनगरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची लहान मुलेदेखील या आंदोलनात सहभागी होत आहेत.


पूर्ण वेळ मैदानात ठाण मांडून बसलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांना मुंबईतील सेवाभावी संस्था, ट्रस्ट यांच्याकडून बिस्किटांची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या देण्यात येत आहेत. घाटकोपर येथील स्वामी समर्थ मठामधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एका वेळचे जेवण देण्याची तयारी दर्शवली आहे. दुपारी दोन वाजता आणि रात्री साडेआठ-नऊ वाजता संपकरी कर्मचाऱ्यांना जेवण देण्यात येते. डाळ-भात, लोणचे तर कधी चपाती-भाजी असे जेवण असते. याचबरोबर स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याकडून कर्मचाऱ्यांना जेवणासाठी मदत करण्यात येते, अशी माहिती असे संपात सहभागी झालेल्या पांडुरंग कांबळे यांनी दिली.


मुंबई तसेच उपनगरात अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक राहतात. महामुंबई परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून डबे आणले जातात. दुपारचे जेवण मिळेपर्यंत हाच डबा अनेकांचा आधार असतो. विविध जातीधर्मातील लोक 'एसटी' या नावाखाली एकत्र आल आहेत. कोणत्याही भेदभावाशिवाय डब्यातील चटणी-भाकरी, भाजी-भाकरी वाटून खातात, असे सोलापूर आगारातील महिला वाहक रुक्मिणी साबळे यांनी स्पष्ट केले.


मागणी का मान्य होत नाही?


'जी चटणी-भाकरी आम्ही आगारात, गाडीत खात होतो, तीच येथेही खात आहोत. मैदानात अनेक राजकीय पक्षांची नेते मंडळी येतात. आमच्या मागणीला पाठिंबा दर्शवतात. तुमची मागणी योग्य आहे, तुमचा पगार कमी आहे, हे मान्य करतात. असे असून ही सरकारकडून मागणी का मान्य केली जात नाही?' असा प्रश्न परभणी आगारात वाहक म्हणून काम करणाऱ्या रुकसाना यांनी उपस्थित केला आहे.


स्वच्छतागृह, टँकरचा आधार


महापालिकेतर्फे मैदानात फिरते स्वच्छतागृह, पाणपोई यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाण्याचा टँकरही उपलब्ध असल्याने संपकऱ्यांना आधार मिळतो.


नाश्ता, बिस्किटांचा पुरवठा


अनेक दानशूर व्यक्ती नावही न सांगता नाश्ता, बिस्किटे देतात. या मदतीबद्दल आम्ही मुंबईकरांचे आभार मानतो. आता सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी, ही एकच अपेक्षा आहे, असे संपकरी सांगतात.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post