सीमेवर चीनचा फौजफाटा; भारतही सज्ज


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - सीमारेषेवर चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून लष्करी तयारीही केली आहे. मात्र, या देशाचे कोणतेही आव्हान मोडून काढण्यासाठी भारताचे सैनिक सज्ज असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या तणावावर निवेदन करताना सिंह यांनी समस्त देशवासीय आणि संसद सैनिकांच्या पाठीशी असल्याचेही नमूद केले.


भारत आणि चीन यांच्यादरम्यान अनेक ठिकाणी निश्‍चित अशी सीमारेषा नाही. या पार्श्‍वभूमीवर शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांत अनेक करार करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही काळात एकतर्फी सीमा  बदलण्याचा प्रयत्न चीनने केला असल्याचा आरोप सिंह यांनी केला. जोपर्यंत सीमावाद सुटत नाही, तोवर प्रत्यक्ष ताबा रेषेचे (एलएसी) उल्लंघन करायचे नाही, असे ठरविण्यात आलेले आहे. 1990 ते 2003 या कालावधीत चीनने करारांचे नीट पालन केले, पण त्यानंतर चीनने यादृष्टीने पुढे वाटचाल केली नाही, असे सिंह यांनी सांगितले.


गेल्या एप्रिल महिन्यात चीनने लष्करी जवान आणि शस्त्रास्त्रांच्या संख्येत मोठी वाढ केली. भारतीय सैनिक गस्त घालत असताना त्यात बाधा आणण्याचे काम चीनने सुरु केले. 15 जून रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यात चीनने दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. यात आपले सैनिक शहीद झाले, पण चीनलादेखील पाणी पाजण्यात आले. यानंतर 29-30 ऑगस्ट रोजी असाच प्रकार चीनने पँगाँग सरोवराच्या दक्षिणेला केला. तेथेही चीनला धडा शिकविण्यात आला. आपल्या जवानांनी अनेकदा स्थिती संयमाने हाताळली. जेथे संयमाची गरज आहे तेथे संयम आणि जेथे शौर्य आवश्यक आहे तेथे जवानांनी शौर्य दाखविले, असे सिंह म्हणाले.


सीमेबाबतच्या दोन्ही देशांच्या पारंपरिक व्याख्या वेगवेगळ्या आहेत. 1950 आणि 1960 दशकात यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण त्यात यश आले नव्हते, असे सांगून सिंह पुढे म्हणाले, लडाखमध्ये चीनने याआधी बरीच जमीन घशात घातलेली आहे. याशिवाय पाकिस्तानने काही जमीन चीनच्या स्वाधीन केलेली आहे. हा एक मोठा मुद्दा असून त्यावर शांततामय वातावरणात चर्चेने मार्ग काढण्याची गरज आहे. सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी काही सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे 1988 पासून दोन्ही देशांच्या संबंधात वाढ झाली. द्विपक्षीय संबंध वाढू शकतात आणि सीमावादही सुटू शकतो, असे भारताचे मत आहे.


चीनने सीमेवर केलेल्या आगळीकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखचा दौरा करून जवानांचे मनोधैर्य उंचावले. स्वतः आपणही लडाखमध्ये गेलो होतो, असे सांगतानाच सिंह यांनी कर्नल संतोषबाबू यांनी लडाखमध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. द्विपक्षीय करार आणि समझोते संबंध जर मानण्यात आले तर शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे आपण चीनच्या संरक्षण मंत्र्यांना रशियात झालेल्या बैठकीवेळी सांगितले. हीच बाब परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चिनी परराष्ट्र मंत्र्यांना सांगितली, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.


भारतीय सैनिकांचा जोश आणि मनोधैर्य बुलंद असून कोणतेही आव्हान मोडून काढण्यासाठी ते तयार असल्याचे सिंग यांनी सांगितले. लडाखमध्ये सध्या आपण आव्हानात्मक स्थितीतून जात आहोत. अशावेळी संपूर्ण सदन जवानांसोबत आहे, असा संदेश जाण्यासाठी संसदेत ठराव संमत केला पाहिजे, असे सांगून सिंह पुढे म्हणाले की, देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश चीनला देण्यात आला आहे. देशाच्या सीमा सुरक्षित असून आपले जवान मातृभूमीच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. चीनच्या कुरापतीनंतर लष्कर तसेच आयटीबीटीच्या सैनिकांची तैनाती वाढविण्यात आली आहे.


लडाखमधील थंडी आणि प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन सैनिकांना आवश्यक ती उपकरणे, उबदार तंबू व कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांना आवश्यक शस्त्रास्त्रे व दारुगोळाही उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली. चीनने गेल्या काही दशकात सीमेच्या पलीकडे आपल्या भागात प्रचंड प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे, या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा निर्धार केला आहे, त्या दृष्टीने अर्थसंकल्पात दुपटीपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे, असे सिंह यांनी नमूद केले.


लडाखमधील 38 हजार चौ.कि.मी. जमीन चीनकडून अवैधपणे ताब्यात पूर्व लडाख सीमेवर चीनसोबतच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पाश्‍वर्र्भूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत महत्त्वपूर्ण निवेदन केले. लडाखमधील भारताची 38 हजार चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावलेली आहे. याशिवाय आणखी 90 हजार चौरस किलोमीटर जमीन आपली असल्याचा चीनचा दावा असल्याचेही सिंह यांनी सांगितले. सन 196

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post