माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट बनवला, त्यातही पुढे चुकीचे उपचार दिले. यात रुग्णाचा मृत्यू झाला. हा प्रकार मृत्यूपर्यंत न थांबता, मृताच्या अवयवांची तस्करीसाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. या प्रकरणाची गेली पाच वर्षे फिर्यादी पाठपुरावा करत होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याची दखल घेत, अहिल्यानगर शहरातील पाच नामांकित डाॅक्टारांसह एका अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. या प्रकरणामुळे अहिल्यानगरसह राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
न्युक्लिअस हॉस्पिटलचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर (रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी), डॉ. सचिन पांडुळे, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. मुकुंद तांदळे (सर्व रा. नगर) आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅबचे तज्ञ डॉक्टर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. कटकारस्थान, फसवणूक, आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. मयताचे पुत्र अशोक बबनराव खोकराळे (वय 47, रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव (वय 79) यांना 13 ऑगस्ट 2020 रोजी घशात खवखव आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत होता. त्यांना डॉ. पांडुळे यांच्या पटियाला हाऊस इथल्या कोविड सेंटरमध्ये वडील बबनराव यांना दाखल केले. त्यावेळी वडिलांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही त्यांना निरीक्षणाखाली ठेवले. दुसऱ्या दिवशी, 14 ऑगस्टला, फिर्यादीला न कळवताच बबनराव यांना डॉ. बहुरुपी आणि डॉ. बोरकर यांच्या न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये परस्पर हलवले.
बबनराव यांनी न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथून त्यांची मुलं अशोक आणि अरविंद यांना फोन केला. "हे लोक मला मारून टाकतील, मला बेडला बांधून ठेवतात, खूप रक्त काढले, मला इथून घेऊन जा," अशी फोनवर विनवणी केली. यावर फिर्यादी अशोक याने न्युक्लिअस हॉस्पिटलकडे धाव घेतली. परंतु फिर्यादीला वडिलांना कोरोनाचं कारण सांगत भेटू दिलं नाही. डॉक्टरांनी आधी 'रुग्ण नॉर्मल आहे' असे सांगितलं. मात्र नंतर 'ते कोरोना पॉझिटिव्ह' असल्याचे सांगून डिस्चार्ज देण्यास टाळाटाळ केली.
फिर्यादीच्या वडिलांचा मृतदेह आजपर्यंत सापडलाच नाही
18 ऑगस्ट 2020 रोजी फिर्यादीला वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली. हॉस्पिटलने 1 लाख 84 हजार रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. बिल भरल्यानंतर, मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्याचे सांगितले. मात्र, फिर्यादीने सिव्हिल हॉस्पिटल, अमरधाम आणि न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये शोधाशोध करूनही वडिलांचा मृतदेह आजपर्यंत सापडलेला नाही, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीने याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या समितीने देखील डॉक्टरांनी "गैरव्यवहार, निष्काळजीपणा, आणि हलगर्जीपणा" केल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. अखेर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, काल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवयव तस्करीच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट
कोरोना नसताना खोटे आरटीपीसीआर रिपोर्ट बनवले. पैसे उकळण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीचे उपचार देणे. रुग्णाला बेडला बांधून ठेवणे, धमकावले आणि जेवणही दिले नाही. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार दाखवून बिले उकळली. पुरावा नष्ट करण्यासाठी आणि अवयव तस्करीच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली, असे गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे तपास करत आहेत.
Post a Comment