प्रशासनाच्या सतर्कतेने 'हा' आठवडे बाजार झाला बंद
भाजीपाल्याची चढ्या भावाने विक्री : नागरीकांची गर्दी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील जेऊर येथे प्रशासनाचा आदेश असतानादेखील शनिवारचा आठवडे बाजार भरला होता. परंतु तलाठी व एम.आय.डी.सी. पोलीस यांच्या सतर्कतेमुळे बाजार तात्काळ बंद करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना व्हायरसने जगाबरोबर भारत देशात थैमान घातले असुन त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी गावातील आठवडे बाजार व इतर कार्य बंद करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे. तरीदेखील शनिवार दि २१ रोजी जेऊर येथे काही व्यापारी व शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. भाजीपाल्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तीन ते चार पट भावाने भाजीपाल्याची विक्री करण्यात येत होती. बाजार भरल्याची माहीती एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन तसेच तलाठी एम. एम.पठाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ जेऊर गावामध्ये धाव घेत बाजार बंद केला. पो.हे.कॉ. रमेश थोरवे व त्यांच्या सहका-यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागात अद्यापही कोरोना विषयी नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.
आठवडे बाजार भरल्यानंतर काही नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तलाठी एम.एम. पठाण यांनी प्रशासनाच्या वतीने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे.
दुधाच्या नावाखाली दुकाने उघडे ठेवण्याचा प्रताप
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यावर काही विक्रेत्यांनी नविन शक्कल काढली आहे. हे व्यवसायीक नावापुरते दुध विक्रिला ठेवुन इतर माल मोठ्या प्रमाणात विकत आहेत. व्यवसायीकांचा हा प्रताप प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
स्वत:ची जबाबदारी पार पाडा
कोरोना व्हायरसशी लढा देताना प्रत्येक नागरिकांनी गांभीर्याने आपली जबाबदारी पार पाडावी. तसेच या काळात प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे.
-- डॉ. हेमंत इंगळे, आरोग्यमित्र फाऊंडेशन, जेऊर
Post a Comment