मला संरक्षण नको, पोलिस सुरक्षा काढून घ्या- अण्णा हजारे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनग
र : मी कधीही सरकारकडे संरक्षण मागितले नाही आणि धमक्यांनाही घाबरलो नाही. पण वेळोवेळी माझी हत्या करण्यात येणाऱ्या धमक्यांमुळे सरकारने मला सुरक्षा लावली. मला सुरक्षा घेणे योग्य वाटले नाही म्हणून मी सरकारला चार वेळेला माझी सुरक्षा काढा अशी पत्र लिहिली. पण अद्यापही सरकारने माझी सुरक्षा काढली नाही. आता परत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून अण्णांनी आपल्याली सुरक्षा काढण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, गावातील मंदिराच्या एका खोलीमध्ये राहणाऱ्या एका फकीराच्या सुरक्षावर मोठा होणारा खर्च मनाला पटत नाही. माझ्या सुरक्षेवर होणारा मोठा खर्च हा सरकारी तिजोरीतून जरी होत असला तरी तो पैसा सामान्यतला सामान्य माणूस जो झोपडीत राहतो व जगण्यासाठी जे जीवनावश्यक साहित्य खरेदी करतो त्या साहित्यावर लावलेल्या जीएसटी कराच्या रूपातील पैसा आहे. अशा गरीबामधील गरीब माणसांचा कराच्या रुपात जमा होणारा पैसा माझ्या संरक्षणावर मोठा खर्च होतो हे मनाला पटत नव्हते. म्हणून शासनाला संरक्षण काढून टाकण्यासाठी वेळोवेळी पत्रं दिली होती. आज काही लोकांना मागे पुढे बंदुकधारी माणसं घेऊन चालण्यामध्ये भूषण वाटते. पण मला ते दुषण वाटते म्हणून ते काढण्यासाठी मी वेळोवेळी पत्र देऊन काढण्याचा प्रयत्न केला. मनाला पटत नसल्यामुळे मी एक पत्र सरकारला असेही लिहिले होते की माझी सुरक्षा काढली नाही तर मी या संरक्षकांना माझ्या गावात येण्याचे बंद करील. या पत्रामुळे पोलीस खात्याचे वरीष्ठ अधिकारी पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी स्वत: येऊन त्यांनी सांगितले की सुरक्षा अण्णा हजारे या व्यक्तीसाठी नसून अण्णा हजारे ही सार्वजनिक संपत्ती असल्याने आम्ही सुरक्षा दिलेली आहे. एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मी त्यावेळी थांबलो.

त्याचप्रमाणे माझ्या संरक्षणावर सरकारी गाडीचा पेट्रोल, डिझेलचा खर्च जरी सरकार करीत असेल तरी तो गरीब माणसांच्या वसूल केलेल्या कराचा पैसा असल्याने बाहेर फिरण्यावर ही मी मर्यादा घालतो. आवश्यकतेशिवाय कुठेही जात नाही. लोकांनी वर्गणी करून मला इनोव्हा गाडी घेऊन दिली आहे. वर्गणीचे पैसे गाडीच्या किमतीपेक्षा सहा लाख रुपये जास्त जमले ते परत करून टाकले. गावात कामे चालली असताना त्या कामांना भेटी देण्यासाठी जाताना टू व्हिलर ने जातो. कारण तो जनतेचा पैसा आहे. जपून वापरला जावा. आता मला असे समजले आहे की राज्यातील काही लोकांची दिलेली सुरक्षा काढण्यात येणार आहे म्हणून आपणाकडे विनंती करीत आहे की माझी सुरक्षा काढून टाकावी. तुम्ही सुरक्षा देऊन माझे मरण थांबणार नाही ते कधीतरी येणारच आहे. मला लावलेल्या सुरक्षाने माझे मरण थांबणार असेल तर स्व. इंदिरा गांधी व स्व. राजीव गांधी यांची हत्या झाली नसती. सुरक्षामुळे मरण थांबणार नाही. उच्च दर्जाची सुरक्षा असताना त्यांना मारले गेले. नाही तरी आज हार्ट अटैक येऊन माणसं मरतात तसे मरण येण्यापेक्षा सुरक्षा नसताना समाज, राज्य, राष्ट्रहितासाठी मरण येणे हे खरे मरण आहे. अशी माझी धारणा आहे. ज्यावेळी काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जातो त्यावेळी गाडीच्या पुढच्या सीटवर न बसता मागच्या सीटवर बसतो. कारण बरोबर लाल दिव्याची गाडी असते. गर्दीच्या ठिकाणी सायरन वाजल्यामुळे लोक गाडीकडे पाहतात कोण व्यक्ती आहे? तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे मान वर न जाता खाली जाते. त्यामुळे मागच्या सीटवर लोकांना दिसत नाही.

आपणास माझी विनंती आहे की आपण माझी सुरक्षा काढावी. या सुरक्षावर फार मोठा खर्च होतो. गरीब जनतेचा पैसा आपल्या सुरक्षावर खर्च होऊ नये त्यामुळे संवेदना होतात म्हणून आपण सुरक्षा काढून टाकावी. माझ्या बाबतीत एखादे वेळी जरी नको अशी घटना घडली तरी मी हे लेखी दिलेले असल्यामुळे तुमच्यावर कोणतीही जबाबदारी राहणार नाही. ज्यांना सुरक्षा कमी पडते अशा लोकांना द्यावी.
Previous Post Next Post