'या' आदर्श गावामध्ये मांडला पाण्याचा ताळेबंद




माय नगर वेब टीम
अहमदनगर – आदर्शगाव हिवरे बाजार मध्ये नवरात्र उत्सवा निमित्ताने मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. यावर्षी हिवरे बाजार मध्ये एकूण ३७० मि.मि. पाउस पडला असून दरवर्षीप्रमाणे पडलेल्या पावसाच्या आधारे पाण्याच्या वापरासाठी पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेत मांडण्यात आला. ग्रामस्थांशी चर्चा करताना पोपटराव पवार म्हणाले गेली अनेक वर्षे आपल्या सर्वांच्या सहकार्याने पडलेल्या पावसावर आधारित पिक पद्धती मुळे गेल्या वर्षी कमी पाऊस असूनहि गावात पाण्याची टंचाई जाणवली नाही. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत १८३ मि.मि.जास्त पाउस पडलेला आहे. यावर्षी सुद्धा नेहमीप्रमाणे पडलेल्या पावसाच्या आधारे दरवर्षीप्रमाणे पिकाचे नियोजन केल्यास संभाव्य टंचाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.



याचप्रमाणे प्रत्येक गावाने वास्तव चित्र ध्यानात घेवून आपले पाण्याचे नियोजन केल्यास येणा-या संभाव्य पाणी टंचाईला काही अंशी मार्ग काढता येईल. यावेळी या विशेष ग्रामसभेस दिल्लीवरून कॅग महा लेखानियंत्रक हरेंद्र सिंह तसेच सुरेंद्र कुमार व राजेश कुमार हे बँक औफ महाराष्ट्र चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवरात्र उत्सवाच्या औचित्याने झालेल्या ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post