कर्जमाफीच्या १०२ कोटींपैकी ४८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ; आमदार अक्षय कर्डिले यांची माहिती



उर्वरित ५२ कोटींसाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न; थकबाकीदारांवर कलम १०१ अंतर्गत कारवाईचा इशारा

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीपोटी मिळालेल्या १०२ कोटी रुपयांपैकी ४८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असून, उर्वरित ५२ कोटी रुपयांच्या रकमेबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून ती रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती आमदार अक्षय कर्डिले यांनी दिली.

अहिल्यानगर तालुक्यातील चाहुराणा शाखेत  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सचिव, अधिकारी, सहकारी संस्थांचे सचिव व पदाधिकाऱ्यांची कर्जमाफीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार कर्डिले बोलत होते. बैठकीत कर्जमाफीची सद्यस्थिती, सोसायट्यांची आर्थिक परिस्थिती, थकबाकी आणि वसुली याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

आमदार कर्डिले म्हणाले, निवडणुका नसतानाही महायुती सरकार जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, २०१४ पासून शेतकरी आणि महिलांच्या हितासाठी युती सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. कर्जमाफीची सुमारे ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी आवश्यक तांत्रिक त्रुटी दूर करून पात्र लाभार्थ्यांना लवकरच लाभ मिळवून देण्यात येईल.

नगर तालुक्याची ही पहिलीच आढावा बैठक असून, तालुक्यातील सहकारी संस्थांचे संचालक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपले पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेच्या सेवेसाठी केलेले काम पुढे नेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा सेवाभावी वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“चांगले काम करा, चुकीचे काम कोणीही करू नका. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये नगर तालुका सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. वसुलीमध्ये तालुक्याला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,” असे आवाहन कर्डिले यांनी केले.

थकबाकी वसुली करताना अडचणी येणार आहेत. त्यासाठी केवायसीसह अन्य तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवून थकबाकीदारांना कर्जफेडीसाठी प्रोत्साहित करावे. वसुली करताना कोणतीही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असेही कर्डिले यांनी सांगितले.

६८ सोसायट्या अनिष्ट तफावतीत

यावेळी रामदास सोनवणे यांनी सांगितले की, नगर तालुक्यात एकूण ११० सहकारी सोसायट्या असून, त्यापैकी ६८ सोसायट्या कर्जमाफीमुळे अनिष्ट तफावतीमध्ये गेल्या आहेत. कर्जमाफीचा आर्थिक भार सोसायट्यांवर पडल्याने त्यांच्या थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. एका वर्षाची थकबाकी सुमारे १९१ कोटी रुपये आहे. त्यापैकी १०२ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली असून, ४८ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. उर्वरित ५२ कोटी रुपये अद्याप येणे बाकी आहेत.

पशुपालनासाठी घेतलेल्या कर्जाला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने संबंधित कर्जखाती अद्याप कर्जमाफीच्या प्रक्रियेत प्रलंबित असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले. सुमारे ९० कोटी रुपयांची थकबाकी असून, ती वसूल करण्यासाठी थकबाकीदारांवर कलम १०१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीस मार्केट कमिटीचे पदाधिकारी, भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक कार्ले, अनिल कारंडे, बाबासाहेब खर्से, विविध सहकारी सोसायट्यांचे सचिव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post