माय नगर वेब टीम
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी २९ ऑगस्ट रोजी 'शेवटचे आणि निर्णायक आंदोलन' करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. "या आंदोलनात एकतर मी जाईन, नाहीतर ते जातील," असा थेट इशारा देत जरांगे यांनी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे.
सरकार मराठा समाजाला वेड्यात काढतंय
अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, मराठा समाजात ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तरीही सरकार पात्र मराठ्यांना प्रमाणपत्रे का देत नाही? मराठा समाजाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज सातत्याने संघर्ष करत आहे, मात्र सरकारकडून केवळ आश्वासनं दिली जात आहेत.
फडणवीसांना थेट सवाल
मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी थेट संवाद विचारला. ते म्हणाले, फडणवीस साहेब, हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे का मिळत नाहीत? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. नोंदी सापडूनही प्रमाणपत्रे नाकारली जात असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
२९ ऑगस्टला आंदोलनाला ३ वर्षे पूर्ण
२९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला तब्बल तीन वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवसाचे औचित्य साधून या संघर्षाचा शेवट करण्यासाठी अखेरचे आणि निर्णायक आंदोलन पुकारण्यात आले आहे. तीन वर्षांच्या दीर्घ लढ्यानंतर आता सरकारची कोणतीही दिशाभूल खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या -
1) राज्यात सापडलेल्या ५८ लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या
2) हैदराबाद गॅजेटिअरनुसार मराठवाड्यातले सगळे प्रमाणपत्र घ्यायचे.
3) सातारा, कोल्हापूर, पुणे औंध आणि बॉम्बे या पाचही संस्थानच्या गॅजेटिअरची अमंलबजावणी जीआरसहीत पाहिजे.
4) मराठा आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे.
5) ओबीसीच्या सर्व सोई- सुविधा मराठा समाजाला लागू करा.
6) अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत.
7) सारथीच्या योजना पुन्हा सुरु करण्यात याव्यात
8) मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं.
9) एसईबीसीचे, ईएसबीसी आणि एसडब्लू एस मधून निवड झालेलेल्यांना नियुक्त्या द्या.
10) मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी आणि आर्थिक मदत द्यावी.
फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल
मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? असा सवालही जरांगे पाटलांनी केलाय. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. आता आरपारपाची लढाई असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. २९ ऑगस्टपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारपुढे १० मागण्या असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितल्या. मराठ्यांना किती वेड्यात काढायचे. मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? मराठे टार्गेट कशामुळे? आम्ही तुमच्यासाठी राजकारणामुळे नाही आरक्षणासाठी भांडत आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Post a Comment