माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : खासदार नीलेश लंके यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मतदारसंघाशी संबंधित विविध महत्त्वाच्या व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी एकूण पाच निवेदने सादर करत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
खासदार लंके यांनी माजी सैनिकांना
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेअंतर्गत (ईसीएचएस) मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला. अहिल्यानगर येथील माजी सैनिक संतोष जगन्नाथ पिसे यांना डायलिसिससारख्या अत्यावश्यक उपचारासाठी संबंधित रुग्णालयाने ईसीएचएस अंतर्गत सेवा देण्यास नकार दिल्याची बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकारामुळे संबंधित रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, अशा समस्या इतर माजी सैनिकांनाही भेडसावत असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत तात्काळ योग्य त्या सूचनांचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, मृत सैनिक योगेश बापूराव शिर्के यांच्या पत्नीच्या प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला पेन्शनरी लाभ देणे अथवा शासकीय सेवेत पुनर्वसन करण्याची मागणी लंके यांनी केली. संबंधित विधवा आपल्या अल्पवयीन मुलासह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, अहिल्यानगर व राहुरी तालुक्यातील सैन्य क्षेत्रालगतच्या गावांमध्ये बांधकामासाठी अन-आपत्ती प्रमाणपत्र संदर्भातील परिपत्रकांमधील विरोधाभासामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा मुद्दा त्यांनी मांडला. २०११ व २०१६ मधील परस्परविरोधी आदेशांमुळे स्थानिक प्रशासन व सैन्य अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर एकसंध, स्पष्ट आणि अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे तातडीने जारी करण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या मालकी हक्कांवर या निर्बंधांचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देत, त्यांच्या वैध हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणीही लंके यांनी केली. तसेच प्रशासन, सैन्य यंत्रणा आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यासोबतच, अहमदनगर स्टेशन मुख्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या कपूरवाडी तलावात साचलेला गाळ काढण्याची मागणी करण्यात आली. या तलावातील गाळामुळे जलसाठा कमी झाला असून, तो काढल्यास परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळू शकतो, असे लंके यांनी स्पष्ट केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खासदार लंके यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे अहिल्यानगर (दक्षिण) मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, खासदार लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

Post a Comment