कांदा गेला वाया; शेतकऱ्याची आत्महत्या



 माय अहमदनगर वेब टीम - 

नगर तालुक्यातील ससेवाडी येथील शेतकरी दिलीप आण्णा मगर (वय ५३) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्व. दिलीप आण्णा मगर यांच्याकडे सेवा सोसायटी व विविध बँकांचे कर्ज होते. सात एकर क्षेत्र नावावर असून गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेली नैसर्गिक आपत्ती व कोरोनाच्या महामारी मुळे ते कर्ज फेडू शकले नाहीत.

      ससेवाडी गाव कांदा उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला अन् कांदा पिके वाया गेली. कांदा लागवडीसाठी मोठा खर्च येत असुन खराब हवामानामुळे कांदा पिक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला जात आहे. कांदा लागवडीसाठी उत्पन्नाच्या भरवशावर कर्ज काढून कांदा लागवड केली जाते. परंतु हवामानाने साथ न दिल्याने झालेला खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.

     शेतकरी दिलीप मगर यांनी कर्जबाजारी पणामुळे विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली. शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. विलास मगर यांचे ते वडील होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post