'आरक्षण टिकवायचे असेल तर ओबीसी म्हणून एकत्र या'



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - घटनेने दिलेल्या ओबीसीचा हक्क टिकवायचा असेल तर प्रथम ओबीसी म्हणून एकत्र या जात हा विषयच नको, तरच तुम्ही राज्यकर्ते व्हाल. पद आज आहे, उद्याचे कोणाला माहित. मात्र मला मिळालेल्या पदाचा उपयोग ओबीसींना न्याय देण्यासाठी केला तर जनतेच्या मनात मी कायम राहील, असे प्रतिपादन बहुजन विकास मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ओबीसी व्ही.जे.एन.टी मोर्चाच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब सानप होते. 


ना.वडट्टीवार पुढे म्हणाले, ओबीसीसाठी छगन भुजबळ यांचा पुढाकार मोठा आहे. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींसाठी जे केलं तोच वारसा मी स्वीकारला आहे. ओबीसींची जनगणना करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र केंद्राने ही मागणी स्विकारली नाही तर राज्य स्वतंत्रपणे ओबीसींची जनगणना करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. ओबीसींची जनगणना झाली तर ‘ज्याची संख्या भारी त्याचा हिस्सा भारी’ असे समीकरण निर्माण होईल. देशांमध्ये 60 टक्क्याच्यावर ओबीसी दिसेल. हा 60 टक्के ओबीसी समाज गेली सत्तर वर्षे उपेक्षित आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या तो मागासलेला आहे. अलीकडे मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे 19 टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला, पण कुणबीच्या खोट्या दाखल्यामुळे ते हिरावलं गेलं.

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तो पर्यंत एम.पी.एस.सी.च्या निवडींना काही उपद्रवी लोकांनी आडकाठी आणली आहे. मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र त्यांचा ओबीसीत समावेश नको, ही आपली भूमिका आहे. मात्र त्यालाही उपद्रवी लोक आमचं होत नाही, मग तुमचं कशाला, असे म्हणत आडकाठी आणत आहेत. एम.पी.एस.सीच्या संदर्भात 25 तारखेनंतर निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

सरकारमध्ये ओबीसींचे प्रश्न आपण मांडतो, मात्र संघटनेच्या व्यासपीठावरही ते मांडले पाहिजेत. या चळवळीत तुम्ही एकत्र आले पाहिजे असा सवाल उपस्थित करुन ओबीसी चळवळीला उद्देशून ते म्हणाले, कोणी नेतृत्वासाठी, कोणी जातीसाठी असं राजकारण होता कामा नये. 382 जाती या उपेक्षित आहेत, त्या सर्व जातीच्या शक्तींची गरज असून तलवारीची गरज नाही. छत्रपती शाहू महाराज उपेक्षितांच्या बाजूने उभे राहिले, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बाराबलुतेदारातुनच निर्माण झाले म्हणून आम्हाला छत्रपतींचा अभिमान आहे, मात्र आधी आमचं मिळावं असं जर कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे असा टोला वडेट्टीवार यांनी खासदार छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचे नाव न घेता मारला.

ओबीसी ओबीसीच नाहीत अशी याचिका सराटे बाबा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. म्हणजे मालक घराबाहेर आणि बाहेरचे घरात अशातला हा प्रकार आहे. ओबीसी समाज हा विखुरलेला आहे, आजही म्हणावा तसा तो जागरूक नाही. समाज एक झाल्याशिवाय ओबीसींना भवितव्य नाही आणि पुढची पिढी बरबाद होण्याची भीती आहे. बाराबलुतेदारांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद पुढच्या बजेटमध्ये होईल. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नाभिक समाजात 15 आत्महत्या घडल्या त्यांना दोन लाख रुपये मिळावेत ही आमची मागणी होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी एक लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे.

ओबीसीचे वक्ते लक्ष्मण हाके, प्रा.डॉ.भुषण कर्डिले, बालाजी शिंदे, बी.डी चव्हाण, सौ.साधना राठोड, कल्याण दळे, सोमनाथ काशीद, अरुण खरमाटे, स्थानिक वक्ते अशोक सोनवणे, अंबादास पंधाडे, अंबादास गारुडकर, इंजि.बाळासाहेब भुजबळ, जयंत येलूलकर आदिंची यावेळी भाषणे झाली.

स्वागत आनंद लहामगे यांनी केले तर प्रास्तविक माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी नेते बाळासाहेब भुजबळ, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, हरिभाऊ डोळसे, अनिल निकम, राजेंद्र पडोळे, चंद्रकांत फुलारी, बाबासाहेब सानप, अशोक दहिफळे, अमोल भांबरकर, शशिकांत पवार, रमेश बिडवे, किरण बोरुडे, विशाल वालकर, दत्ता जाधव, अनिल निकम, श्रीकांत मांढरे, करण ढापसे, संजय आव्हाड, संजय सैंदर, अनिल इवळे आदी प्रयत्नशील होते.

यावेळी नगरसेविका पल्लवी जाधव, अभय आगरकर, नगरसेवक सुनील त्रंबके, अनिल बोरुडे, बाबुशेठ टायरवाले, शरद झोडगे, विक्रम राठोड, नईम शेख, फिरोज शफी खान, गर्जे, माऊली गायकवाड, निशांत दातीर, सागर फुलसैंदर, सौ.फुलारी, वनिता बिडवे, स्वाती पवळे, मनीषा गुरव, नितीन घोडके, सचिन जाधव, संदिप वाघमारे, संतोष गेनप्पा, गौतमी भिंगारदिवे, अक्षय बहिरवाडे, गोरक्षनाथ गावडे, माजी आ.नामदेव मुंडे, राजेंद्र राख, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, डॉ.अभिजित शिंदे, डॉ.सुदर्शन गोरे, मिसाळ सर, बालाजी डहाळे आदी उपस्थित होते, मेळाव्याच्या शेवटी विविध संघटनांच्या वतीने मंत्री महोदयांना निवेदने देण्यात आली. सूत्रसंचालन अमोल बागुल आणि राजेश सटाणकर यांनी केले. प्रारंभी पिंपळगांव माळवीच्या लोककलाकारांनी भारुड सादर केले, यानंतर अलिकडे निधन पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रमेश सानप यांनी आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने मेळावाचा समारोप झाला. 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post