धीर धरा, नक्की मार्ग काढू; शरद पवारांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

 


माय अहमदनगर वेब टीम

उस्मानाबाद: “शेतकऱ्यांवर आलेले हे संकट दीर्घ परिणाम करणारे आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीला आपण एकत्रितपणे तोंड देऊ, सरकारची ताकद उभी करू, पण राज्य सरकारला मर्यादा आहेत. अशा संकटसमयी केंद्र सरकारने राज्याला मदत केली पाहिजे. महाविकास आघाडीचे खासदारांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, ”असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले.


गेल्या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्यातून सर्वप्रथम शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्यात पोचले. रविवारी सकाळी त्यांनी काक्रंबा (ता. तुळजापूर) परिसरात शेतीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. आमचं सगळ शेतच वाहून गेलं या शब्दात शेतकऱ्यांनी पवार यांच्यासमोर अडचणी मांडल्या. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यावेळी उपस्थित होते.

“राज्यावर आलेले हे अस्मानी संकट आहे. याचा आपण एकत्रितपणे सामना करू. शेतकऱ्यांकडे ताकद नसली की सरकार ती उभी करते. राज्य सरकारच्या मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. केंद्राने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत,” असे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार विक्रम काळे, संजय निंबाळकर, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post