कोणत्याही शेतकऱ्याला आवश्यक बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही




माय अहमदनगर वेब टीम
गडचिरोली – राज्यातील खरीप व रब्बी हंगामादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याला आवश्यक बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी गडचिरोली येथे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिला. वडसा तालुक्यातील नैनपूर येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन प्रत्यक्ष बांधावर जाऊन, कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्यानिमित्त आज ना.भुसे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन नैनपूर येथे करण्यात आले होते. जिल्ह्यातील नैनपूर गावाचे शेतकरी गजेंद्र ठाकरे यांच्या शेतावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गजेंद्र ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार ना.भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री महोदयांनी श्री. ठाकरे यांचे कौतुक करून या प्रकारे शेकडो शेतकरी तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. यावेळी आरमोरी मतदार संघाचे आमदार कृष्णाजी गजबे, भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर, वडसा नगराध्यक्षा शालुताई दंडवते, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, माजी आमदार मडावी, आनंदराव गेडाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, डॉ.कराडे, प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली तानाजी खर्डे विभागीय कृषी अधिकारी वडसा, विशाल मेश्राम उपविभागीय अधिकारी वडसा, दिशांत कोळप कृषी विकास अधिकारी गडचिरोली, निलेश गेडाम तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात खरीप हंगामात १६ लक्ष क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्यात १७ लक्ष बियाण्यांची व्यवस्था केली आहे. राज्यात ७० टक्के पेरण्या झालेल्या आहेत. उर्वरित पेरण्याही लवकरच पूर्ण होतील अशी माहिती मंत्र्यांनी उपस्थितांना दिली. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी या करिता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. याचा फायदा तळागाळातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कृषी दिनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, स्व.वसंतराव नाईक यांनी विकासाला वळण देणाऱ्या योजना राबविल्या. या पार्श्वभूमीवर कृषी सप्ताहाच्या माध्यमातून प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, शासनाच्या योजना सर्वापर्यंत पोहचविल्या जाणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना गट शेती करण्याचे आवाहन

कृषिमंत्री दादाजी भुसे यांना शेतकऱ्यांशी संवाद साधताना गट शेती व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून शेती करा व विकास साधा असे आवाहन केले. गट शेतीमधून शेतकरी बळकट होत आहेत. तसेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून प्रगत शेती करा असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमानंतर त्यांनी वडसा येथील आंतर जी जी या गावातील लक्ष्मी कृषी उद्योगाला भेट दिली. शेतकरी हरीश माने व इतर उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post