कृषीधन कंपनी विरोधात कोपरगावात फसवणुकीचा गुन्हा



माय अहमदनगर वेब टीम
कोपरगाव - सोयाबीन या पिकाचे के एस एल 441 या नावाचे निकृष्ट बियाणे शेतकर्‍यांना विक्री करून त्यांची फसवणूक केली म्हणून तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिलेल्या फियादीनुसार कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना या कंपनीच्या व्यवस्थापकावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक यादवराव आढाव तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे, कोपरगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील शेतकर्‍यांना कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना या कंपनीने के.एस.एल.441 या नावाचे सोयाबीन बियाणे विक्री केली. शेतकर्‍यांनी हे बियाणे शेतात पेरले असता. त्याची 10 ते 20 टक्केच उगवण झाली. सदर कंपनीने शेतकर्‍यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे विक्री करून शेतकर्‍यांची फसवणूक करून नुकसान केले आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दगडु नानाभाऊ अंभोरे, व्यवस्थापक कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड जालना, मुख्य कार्यालय साई कॅपीटल, नववा मजला. सेनापती बापट रोड , जे डब्ल्यू मेरियट हॉटेल समोर, शिवाजी नगर, पुणे यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम 420 सह बियाणे कायदा 1966 चे कलम 6 (ब ), 7 (ब) बियाणे नियम 1968 चे कलम 23 अ,(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन इंगळे करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post