चीनचे परराष्ट्र मंत्री नरमले; 'या' मागणीवर ठाम



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली/बीजिंग : गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवर चर्चा केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी गलवान खोऱ्यातील वाद संवादातून सोडवण्याची मागणी केली आहे. शक्य तेवढं लवकर ही परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली आहे. तर दुसरीकडे चीन परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय सैन्यालाच जबाबदार धरत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. एस जयशंकर यांनीही कणखर शब्दात भारताची बाजू मांडली आहे.

गलवान खोऱ्यात जे घडलं तो एक पूर्वनियोजित आणि योजनाबद्ध कट होता, ज्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात, अशा शब्दात एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. चीनच्या बाजूने जे काही करण्यात आलं ते एक उल्लंघन असून यावर द्विपक्षीय संबंधावर परिणाम होऊ शकतात, असंही जयशंकर म्हणाले. चीनने असा पूर्वनियोजित कट रचण्याऐवजी शांततेच्या मार्गाने तणाव कमी करण्यासाठी अपेक्षित असल्याचं जयशंकर म्हणाले.

चीनचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भारतीय सैन्यावर आरोप केले आहेत. भारतीय सैनिकांनीच घुसखोरी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत आणि चीनने दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये सहमती झालेल्या मुद्द्यांचं पालन केलं पाहिजे. सीमेवरील परिस्थिती हाताळण्यासाठी समन्वय आणि संवादाची आवश्यकता आहे. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या संवाद साधनांचा वापर करावा आणि शांतता कायम ठेवावी, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post