माय अहमदनगर वेब टीम
पुणे - दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. या ठिकाणी लोकांनी अहंकाराला चपराक देत ‘धार्मिक’ प्रचाराला धुडकावून लावले. भाजप ही देशावरील आपत्ती आहे, असे लोकांना वाटत असून तिला दूर ठेवण्यासाठी स्थानिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार यांनी पुण्यातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. या वेळी पवार म्हणाले, दिल्लीचा निकाल अपेक्षित होता. लोकांनी विकासाला मत देत धार्मिक प्रचारालाच ठोकरले आहे. देशात धार्मिक कटुता वाढत आहे. या निकालातून लोकांनी अहंकाराला चपराक दिली आहे. हा निकाल आम्हाला अपेक्षितच होता. केजरीवाल यांच्या फक्त एका रणनीतीमुळे दिल्लीत बलाढ्य भाजपवर मात केली आहे.
भाजपची पराभवाची ही मालिका थांबेल, असे वाटत नाही. ही मालिका महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल. आता आम्हा लोकांची जबाबदारी लोकांना किमान समान कार्यक्रम देण्याची आहे. तो आम्ही निश्चितपणे देणार आहोत. हा कार्यक्रम दिल्यानंतर देशातूनच लोक भाजपला धुडाकावून लावतील. भाजपमध्येही मोदी-शहा यांच्याबद्दल दहशत आहे. त्यांचे लोक इकडे-तिकडे बघतात आणि मग बोलतात, असे सांगत पवार यांनी भाजपवर चौफेर टीका केली. आपने दिल्लीमध्ये केलेले शैक्षणिक काम उल्लेखनीय आहे. केजरीवाल यांच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे.
Post a Comment