माय अहमदनगर वेब टीम
नागपूर : शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे. आधार क्रमांक लिंक करून कर्जमाफी देता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचे पवारांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारवर शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी विरोधकांकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची बैठकही झाली होती. त्यानंतर ठाकरे सरकार लवकरच कर्जमाफी देणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे.
सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतक-यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ ख-या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर होणा-या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले.
Post a Comment