हिवाळ्यात मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबादला पावसाची हजेरी
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई । अहमदनगर - मुंबई उपनगरासह डोंबिवली परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. नाताळ सण साजरा करण्यास घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले. आगामी दोन दिवस पावसाची हजेरी असण्याचा अंदाज आहे. नाशिक, औरंगाबाद, संगमनेरमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवली असून रब्बी हंगामही हातातून जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटक, केरळ दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरची आर्द्रता खेचून घेतली जात आहे. त्याच्या परिणामी मुंबई पावसाने हजेरी लावली असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईसह ठाणे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
थंडी गायब
मुंबईत दुपारपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडणार असल्याची चर्चा मुंबईकरांमध्ये होती. अंधेरी, भांडुप, गोरेगाव, कांजूर, वडाळा, ठाणे, डोंबिवलीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले. त्याचा फटका बाइकस्वारांना बसला. काही ठिकाणी बाइक घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्या.
Post a Comment