प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; प्रशासन निवड़णुकीसाठी सज्ज


माय नगर वेब टीम
अहमदनगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज सायंकाळी ६ वाजता झाली. येत्या २१ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

या निवडणूकीची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासन, निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांनी केली आहे. ही निवडणूक निर्भय, निष्पक्ष, आणि पारदर्शक वातावरणात पार पडेल, असे वातावरण जिल्हा प्रशासनाने तयार केले असून सुलभ निवडणुका हे या निवडणुकी साठीचे ब्रीदवाक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर यंत्रणा जिल्ह्यातील १२ मतदारसंघात ३ हजार ७२२ मतदान केंद्रे असून त्यासाठी १६ हजार ३६७ अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात १६ सखी मतदारसंघ राहणार आहेत तर १२ दिव्यांग संचलित मतदारसंघ राहणार आहेत. वेब कास्टिंगची सुविधा ४१६ मतदान केंद्रांवर असणार आहे. या निवडणुकीसाठी ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या विधानसभा निवडणुकीतही सर्व मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. महिला, नवमतदार, दिव्यांग अशा सर्वांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. संकल्पपत्र, वोट आर्मी, कॅम्पस अॅम्बॅसिडर, सिग्नल विधानसभेचा, मे आय हेल्प यु- मतदार सहायता कक्ष, मेरे देश की सेल्फी- असे सेल्फी पॉईंट, लोकजागर मतदानाचा, पीडब्लूडी वोटर फेस्टीवल, मी विधानसभा बोलतेय हा टॉक शो, विद्यार्थ्यांशी थेट संवाद असे विविध उपक्रम राबविले. सर्व मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला. तो यशस्वी होईल आणि जिल्ह्यातील मतदार मोठ्या संख्येने त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्वास श्री. द्विवेदी यांनी व्यक्त केला.

मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात मतदार सहायता कक्ष उभारला असून तेथे अद्यावत मतदार यादी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेवल ऑफीसरकडे मतदार याद्या दिल्या आहेत. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने वोटर स्लीप मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान आहे, हे शोधणे सुलभ होणार आहे. मतदान करताना छायाचित्र मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. ज्या मतदाराकडे छायाचित्र मतदार ओळखपत्र नसेल त्यांची इतर 11 पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, कामगार मंत्रालय यांचेकडील आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, आमदार /खासदार यांना देण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड आदी पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी आपली ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर स्वीकारता येणार नाही.

मतदानाच्या दिवशीही दिव्यांग मतदारांना मतदार केंद्रापर्यंत येण्यासाठी सुलभ व्हावे, यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी सहायक म्हणून आपण २ हजार ५५७ स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर रॅम्पस्, व्हीलचेअर्सची व्यवस्था, मॅग्निफाईंग ग्लास आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आवश्यक पुरेसा बंदोबस्तही जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. याशिवाय, आर्म अॅक्ट अंतर्गत शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा केली आहेत. समाजकंटकांवर कारवाई करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये जिल्हा महसूल हद्दीच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मतदानाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान केंद्रापासुन 100 मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये मते मिळविण्यासाठी प्रचार करता येणार नाही, मतदान समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेपूर्वी 48 तासात चलचित्र, दुरदर्शन संच किंवा इतर तत्सम उपकरणाद्वारे निवडणूकविषयी कोणतीही बाब लोकांना दाखवू शकणार नाहीत, निवडणूक प्रचारासाठी जाहीर सभा अथवा मिरवणुका आयोजित करण्यात येणार नाही, असे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी वगळता इतरांना सेल्युलर फोन, कॉडलेस फोन नेण्यास परवानगी नाही, याची प्रत्येक मतदारांनी नोंद घ्यावी, जेणेकरुन त्यांना मतदानाच्या दिवशी त्रास होणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post