ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सामूहिक जबाबदारीची खासदार नीलेश लंके यांची हाक
माय नगर वेब टीम
सिंधुदुर्ग : अरबी समुद्राच्या लाटांवर अभिमानाने उभा असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ला आजही दुर्लक्षित अवस्थेत असल्याची खंत खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली. ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार लंके यांच्या पुढाकारातून वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘आपला मावळा’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून किल्ल्यावर रविवार दि. १ मार्च रोजी गड संवर्धन, स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. शेकडो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत किल्ला परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले.
यावेळी शिवराजे देवस्थानचे अध्यक्ष सयाजी सपकाळ, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आपला मावळा चे अध्यक्ष रामेश्वर निमसे, आपला मावळाचे सचिव सीताराम काकडे व आपला मावळा संघटनेचे हजारो मावळे उपस्थित होते.
गडावरील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, थर्माकोल व अन्य अपायकारक साहित्य संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. पर्यटकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले. डस्टबिन आणि बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली. पायवाटा मोकळ्या करून गडाच्या संरचनेला बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.
या वेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, “शिवरायांचे गड हे आपल्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहेत. सिंधुदुर्गसारखा सागरी किल्ला हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू आहे. या गडांची होत असलेली उपेक्षा वेदनादायी आहे. सरकार, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन या वारशाचे संरक्षण केले पाहिजे. ‘आपला मावळा’च्या माध्यमातून गडसंवर्धनाचा हा लढा पुढेही सुरूच राहील.”
या मोहिमेद्वारे युवा पिढीत इतिहासाविषयी अभिमान आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित स्वयंसेवकांनी भविष्यातही अशाच संवर्धन मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. इतिहासाचे जतन ही केवळ भावनिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी असल्याचा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


Post a Comment