शेतकर्‍यांच्या कष्टाला महावितरणचे ग्रहण; क्षणात 7 एकर उस जळून खाक, पण....



दहिगावने ग्रामस्थांनी प्रसंगावधानाने वाचविला 8 एकर ऊस !

माय नगर वेब टीम 

अहमदनगर - यंदा तरी उसाला चांगला भाव मिळेल. या आशेवर 15 एकर उसाची लागवड करुन शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने ऊस काढणीपर्यंत वाढविला मात्र या कष्टाला महावितरण वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे दहिगावने येथील 7 एकर ऊस जळून खाक झाला. तरीही उसळलेले आगीचे डोंब समोर असताना ग्रामस्थांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधान राखून जेसीबीने चर खोदून 8 एकर ऊस वाचविला अशी माहिती उपसरपंच सुर्यकांत पाउलबुधे यांनी दिली.

मंगळवारी सकाळी शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील शेतकरी विनय नाथ पाउलबुधे व गीताताई नाथ पाउलबुधे यांच्या 15 एकर आडसाली ऊसाला महावितरण वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे कामात हलगर्जीपणाने विद्युत तारा ऊसाला चिटकून शॉट सर्किट झाल्याने आग लागली. ऐन उन्हाच्या तडाख्यात आग डोंब तयार होऊन काही क्षणात आग भडकली. ग्रामस्थांनी सरकारी मदतीशिवाय जेसीबीने चर खोदून सात एकर ऊसाची आग आटोक्यात आणली, असे उपसरपंच पाउलबुधे यांनी सांगितले.

महावितरण वीज कंपनीला विद्युत तारा ओढण्यासाठी वेळोवेळी अर्ज दिले. वस्तूस्थिती दाखविली. पण त्यांनी दुर्लक्ष केले तर देखभाल दुरुस्तीचे काम वेळेवर झाले. असते. आज ही दुर्घटना टळली असती तोंडाशी आलेला घास, वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे हिरावला. यंदा ऊसाला तीन हजार भाव होता, पण या वीज कंपनीच्या  हलगर्जीपणाने 400 टन उसाचे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई वीज कंपनीने शेतकर्‍यांना द्यावी, अशी मागणी शेतकरी विनय पाउलबुधे यांनी केली. 

या जळीताचा पंचनामा कामगार तलाठी यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य महावितरण वीज कंपनीला पंचनामा अहवाल व नुकसान भरपाई बाबत लेखी निवेदन देणार असल्याचे गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामस्थांनी सांगितले.

पाउलबुधे वस्तीवरील शेतातील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होता. विद्युत तारा कमकुवत झालेल्या होत्या,याची माहिती महावितरणचे कर्मचारी व अधिकार्‍यांना दिली होती. तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे ही घटना घडली आहे. जळालेल्या उसाचा पंचनामा करुन महावितरणने शेतकर्‍यांस नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उपसरपंच राजाभाऊ पाउलबुधे यांनी केली.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post