पांगरमल तलाठ्याची मनमानी; शेतकऱ्यांशी अरेरावी, ग्रामस्थांनी उचलले 'हे' पाऊल



 तहसीलदारांना निवेदन / पांगरमल तलाठी यांच्या बदलीसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

माय अहमदनगर वेब टीम -

 नगर तालुका- नगर तालुक्यातील पांगरमल गावच्या तलाठी यांच्या मनमानी कारभाराला वैतागून त्यांच्या बदलीसाठी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

     पांगरमल ग्रामस्थांच्या वतीने सरपंच बापूसाहेब आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. पांगरमलच्या तलाठी यांचे काम मनमानी पद्धतीने सुरू असून शेतकऱ्यांशी अरेरावी करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनामध्ये करण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याचा अद्याप पर्यंत पंचनामा करण्यात आलेला नाही. पंचनाम्याच्या नावाखाली उताऱ्यासाठी पैशाची लूट करण्यात येत आहे.

     उतारे, उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी शेतकऱ्यांना आरेरावी केली जाते. तसेच आपल्या कार्यालयात न थांबता जेऊर मंडळाधिकारी यांच्या कार्यालयात पांगरमल तलाठी बसून असतात. पांगरमल गावाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून सदर कार्यक्रमांमध्ये गुरुवार दि. १३ ऑक्टोबर रोजी प्रभाग निहाय मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याचा आदेश होता. परंतु त्या दिवशी यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्याबाबत चौकशी केली असता तुम्ही मला विचारणारे कोण ? अशा स्वरूपात उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आले. व शुक्रवार दि. १४ रोजी मतदार यादी प्रसिद्ध केल्याच्या सरपंचांना सोडून सह्या घेतल्या गेल्या. ही बाब गंभीर असून त्यावर चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे.

     गावातील नवीन नोंदी सुमारे दहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र लाभार्थी यांनाही दाखले देण्यात येत नाहीत. एकंदरीत पांगरमल तलाठी यांचे काम मनमानी पद्धतीने सुरू आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तहसील कार्यालय येथे उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

     निवेदनावर सरपंच बापूसाहेब आव्हाड, देविदास आव्हाड, नवनाथ आव्हाड, रावसाहेब आव्हाड, शरद आव्हाड, सुदाम आव्हाड, नामदेव आव्हाड, नारायण आव्हाड, अशोक आव्हाड, राहुल आव्हाड, अंकुश आव्हाड, अमोल आव्हाड, सोपान आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


 मनमानी पद्धतीने कामकाज 

पांगरमलच्या तलाठी यांच्याकडून संपूर्णता मनमानी पद्धतीने कामकाज सुरू आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. प्रत्येक कामात दिरंगाई तसेच शेतकऱ्यांशी अरेरावी करण्यात येत आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांसह उपोषण करणार आहे.

..... बापूसाहेब आव्हाड (सरपंच, पांगरमल)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post