बँकांनी रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य वेळेत पूर्ण करावे : जिल्हाधिकारी



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर :  जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना दिलेले कर्ज वितरणाचे उद्दिष्ट्य विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. त्याचबरोबर शासन योजनांच्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी पीक कर्ज वाटप, विविध योजनांसाठी केलेले कर्ज वाटप, सद्यस्थिती याचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप नीचीत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर, रिझर्व्ह बँक प्रतिनिधी श्री. सिंद कर, नाबार्डचे जिल्हा उप महाव्यवस्थापक शीलकुमार जगताप आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या बैठकीला सर्व बँकांचे जिल्हा व्यवस्थापक तसेच विविध शासकीय महामंडळाचे प्रतिनिधी, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्हास्तरीय बैठकीत घेतलेल्या निर्णयांची तसेच सूचनांची माहिती तालुका स्तरावर संबंधितांनी पोहोचवावी. जेणेकरून तातडीने त्यावर अंमलबजावणी होऊ शकेल. प्रलंबित प्रकरणे आणि अडचणी बँका आणि यंत्रणा यांनी समन्वय आणि कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करून सोडवाव्यात, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य यापूर्वीच देण्यात आले आहेत. बँकांनी ते उद्दिष्ट्य साध्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

खरीप हंगामात ज्या बँकांची कामगिरी समाधानकारक नव्हती त्याबाबत नाराजी व्यक्त करून रब्बी हंगामात या बँकांनी त्यांची कामगिरीत सुधारणा कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी रब्बी हंगामातील कर्जवाटप, महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना यासह विविध महामंडळांच्या योजनांच्या लाभार्थ्यांना झालेले कर्जवाटप, प्रलंबित प्रकरणे यावर चर्चा झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post