फडणवीसांकडून पवारांना शह देण्याचा असा प्रयत्न



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - दिल्लीत कुणाचेही सरकार असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील साखर कारखानदार लॉबी आणि ऊस उत्पादकांचे नेतृत्व करतात. पण आता प्रथमच भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिग्गज नेते पवार यांची ही भूमिका वठवली असून त्यांनी शुक्रवारी साखर उद्योगाच्या विविध समस्या केंद्र सरकारकडे मांडल्या. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौर्‍याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून हा दौरा शरद पवारांना शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

साखर उद्योग आणि शरद पवार हे गणितच झाले आहे. या उद्योगाची आणि ऊस उत्पादकांना येणार्‍या अडचणींची त्यांना खडा न खडा माहिती आहे. एवढेच नव्हेतर त्यांचे या दोघांसाठीचे योगदान कुणालाही विसरता येणार नाही. त्यांच्या राजकारणाच्या चालीही त्यांच्या शांत व्यक्तिमत्वाला गूढ बनवतात. म्हणूनच अनेकदा ते काय करतील याचा थांग जवळच्यालाही लागत नाही.

समोरच्याचं ऐकून घेऊन ते समजावून घेण्याची त्यांची वृत्ती नेहमी त्यांना अपडेट ठेवते. यातून आतापर्यंत अनेकदा त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारशी वेळप्रसंगी पंगा घेऊन कधी आपले कौशल्य पणाला लावून साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना वेळोवेळी न्याय मिळवून देत दोन्ही घटकांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली शुगर लॉबी ताकदवर बनलली आहे.

शरद पवारांची प्रश्‍न हातात घेतला की ते यश मिळविणारच अशी शेतकर्‍यांची धारणा आहे. पण आता हा प्रश्‍न पहिल्यांदाच फडणवीस यांनी उचलला आहे. या दौर्‍यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांचीही भेट घेतली. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचीही त्यांनी भेट घेऊन शेतकरी आणि साखर उद्योगासंदर्भातील मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले आणि मदतीची मागणी केली. केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे केंद्राकडून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादकांना मदत मिळवून देण्यात ते यशस्वी ठरलेतर पुढे राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांच्या या दिल्ली दौर्‍यामुळे राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यंदा महाराष्ट्रात ऊसाचे पीक वाढले, शेतकर्‍यांनी एफआरपी आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांची भेट घेतली. ऊस आणि साखर कारखान्यांबाबत कृषी मंत्र्यांचीही भेट घेऊन केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदतीची मागणी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या दौर्‍यात त्यांच्यासमवेत साखर कारखानदारीतील दिग्गज हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय कोरे, धनजंय महाडिक, जयकुमार गोरे, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post