बालभारतीचे शिक्षण ‘सह्याद्री’ वाहिनीवर



माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - करोनामुळे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन आणि इतर साधनांअभावी लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत आहे. त्यामुळे एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनतर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण सह्याद्री वाहिनीवर मालिकेद्वारे देण्यात येणार आहे. २० जुलैपासून ‘टिलीमीली’ मालिकेद्वारे हे शिक्षण देण्यात येणार असून राज्यभरातील दीड कोटी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहे. शाळांच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. ऑनलाइन वर्गांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा सर्वच विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. यावर उपाय म्हणून पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर मालिकेद्वारे मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अभ्यासक्रम ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी या इयत्तांच्या पाठपुस्तकांतील पहिल्या सत्रातील आधारित असेल. दररोज प्रत्येक इयत्तेच्या एका विषयाचा एक पाठ प्रत्येक इयत्तेचे साठ पाठ प्रक्षेेपित केले जाणार आहे. आठही इयत्तांचे मिळून ४८० भाग असलेली ही मालिका आठवडयातील सोमवार ते शनिवार याप्रमाणे २६ सप्टेबरपर्यंत सुरू राहणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post