औरंगाबादमध्ये दोन दिवसांत दोन शिवसेना नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू



माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - शहरात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक मोठे नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. औरंगाबादमध्ये मागील दोन दिवसांत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेने औरंगाबादमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे.

नितीन साळवे आणि रावसाहेब आमले असे या नगरसेवकांचे नाव आहे. रावसाहेब आमले यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारादरम्यानच आज त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी नितीन साळवे या अन्य एका शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सलग दोन दिवसात दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णांचा मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

रावसाहेब आमले यांच्यावर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आज प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नितीन साळवे यांच्यावर मागील 7 दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारानंतरही त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर मंगळवारी (7 जुलै) उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते औरंगाबादच्या बालाजी नगर वार्डतून निवडून आले होते.

औरंगाबादेत 7 हजार 300 रुग्ण, 327 जणांचा मृत्यू

औरंगाबादेत आज 166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासोबत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 300 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उपचारानंतर 3 हजार 824 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. औरंगाबादेत सध्या 3 हजार 149  अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post