हेल्थ डेस्क - सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपले आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. अशात काहीजण जिमला जाऊन तिथे मेहनत करून आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु, जिमला जाऊन खूप मेहनत करावी लागत असल्याने काहींना जिमला जाण्याचा कंटाळा येतो. पण, जिमला न जाताही आपल्याला काही गोष्टींचे पालन केल्यास निरोगी आयुष्य जगणे शक्य आहे.
१) रोज सकाळी उठल्यावर चांगला नाष्टा करणे हे शरीरासाठी गरजेचे आहे. सकाळी नाष्ट्यासोबत रोज दोन केळी खाल्यास निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
२) रोज सकाळी उठल्यावर किमान १० मिनिटे तरी चालायला हवे. किमान दहा मिनिटे चालण्याने पूर्ण शरीर हे मोकळे होते आणि आपल्याला ताजे तवाने वाटते. दिवसही चांगला जातो.
३) ऑफिसमध्ये आणि घरी लिफ्टचा वापर न करता जिन्याने चढ-उतार करावी. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न होतील. कॅलरी बर्न झाल्यास शरीरात फॅट वाढत नाही. दैनंदीन जीवनात अशा काही सवयी लावून घेतल्यास फायदेशीर ठरते.
४) दररोज रात्रीचे जेवण हे आठ वाजण्यापूर्वी करायला हवे. रात्रीच्या जेवणात कमीत कमी अन्न असावे. तसेच, रात्रीच्या जेवणात हलके अन्न घेण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ खाणे टाळावेत. याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
५) आपल्याला नेहमी फास्टफूड खाण्याची इच्छा होत असते. परंतु, निरोगी आयुष्यासाठी फास्टफूड खाणे हे टाळायला हवे. फारतर आठवड्यातील एखाद्या दिवशी फक्त फास्ट फूड खायला हवे. फास्ट फूड जास्त खाल्याने अंगावर चरबी येऊन आपण स्थूल बनू शकतो.
६) आठवड्यातून एक वेळेस संपूर्ण शरीराची मालीश करायला हवी. खोबरेल तेलापासून मालिश केल्यास फायदेशीर ठरू शकते. मालिश केल्याने आपल्या मांसपेशी या मजबूत होतात. तसेच, मालिश केल्याचे असे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी आहेत.
७) दिवसभरात आपल्याला ज्यावेळी वाटेल त्यावेळी पाच मिनीटासाठी ध्यान करायला हवे. यावेळी आपण आपल्या श्वसनक्रियेवर लक्ष द्यायला हवे. यामुळे आपल्यावरील ताण कमी होऊन आपल्याला शांती लाभते. याचा निरोगी आयुष्यासाठी खूप चांगला फायदा होतो.
८) दैनंदिन जीवनात कच्च्या भाज्या खाण्यावर भर द्यायला हवा. जेवणात नेहमी कच्ची फळे आणि भाज्या असायला हव्यात. तसेच, दैनंदिन जेवणात हिरव्या भाज्यांचे प्रमाण अधिक असायला हवे. त्यासोबत जेवणात उकडलेल्या डाळींचाही समावेश करायला हवा.
९) रोज सकाळी लवकर उठण्याची आणि रात्री लवकर झोपण्याची सवय लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठल्याने आणि रात्री लवकर झोपल्याने आयुष्य निरोगी राहण्यासाठी मदत होते.
१०) पावसाळा असो वा हिवाळा कुठल्याही ऋतूत एका दिवसात किमान पाच ते सहा लिटर पाणी प्यायला हवे. पाणी हे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पाणी प्यायल्याचे खूप फायदे आहेत. अधिकाधिक पाणी पिल्याने निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
Post a Comment