तर देशाला जबर किंमत मोजावी लागणार!



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लस शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असले, तरी ही लस लवकर आली नाही तर देशाचा जीडीपी दर उणे ७.५ टक्क्यांपर्यंत खाली जाऊ शकतो, असा इशारा खासगी वित्तसंस्था बँक ऑफ अमेरिका सेक्युरिटीजने दिला आहे. कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्थाना मोठा दणका बसलेला आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी विविध राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था थंडावली आहे. विषाणूवर मात करणारी लस शोधण्यासाठी विविध देशांमध्ये जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पूर्णपणे परिणामकारक लस कधी येणार, याची शाश्वती नाही. यामुळे अर्थव्यवस्था आणखी अडचणीत येण्याची शक्यता बँक ऑफ अमेरिका सेक्युरिटीजने वर्तवली आहे.

र्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताचा जीडीपी दर उणे पाच टक्क्यांपर्यंत खाली जाण्याचा अंदाज याआधीच विविध अर्थसंस्थांनी वर्तवलेला आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत जर लस आली नाही तर भारताचा जीडीपी दर उणे साडेसात टक्क्यांपर्यंत खाली जाऊ शकतो, असेही अहवालात म्हटले आहे. प्रत्येक महिन्याच्या लॉकडाउनमुळे रिअल जीडीपी दरावर एक टक्के इतका परिणाम होतो. कोरोना संकटातही अर्थव्यवस्थेला बळ मिळावे, यासाठी रिझर्व्ह बँकेकडून भविष्यात आणखी दोन टक्क्याने व्याजदरात कपात केली जाऊ शकते, असा अंदाजदेखील बीओए सेक्युरिटीजने वर्तवला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post