'या' मुख्यमंत्र्यांचं PM मोदींना पत्र ; 'माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न'



माय अहमदनगर वेब टीम
जयपूर - राजस्थानमधील सत्तासंघर्ष वाढत आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. निवडून आलेलं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सरकार खाली पाडण्यात भाजपचे नेते सहभागी आहेत. या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचा हात आहे. आमच्या पक्षाचे अति महत्वाकांक्षी नेतेही यात सामील आहेत. आमदारांच्या घोडेबाजाराच्या माध्यमातून सरकार पाडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असं मुख्यमंत्री गहलोत म्हणालेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हे पत्र १९ जुलै लिहिलं होतं. ते आता समोर आलं आहे. गहलोत यांनी या पत्रात मध्य प्रदेश सरकार पाडण्याविषयी नमूद केलं आहे. कोरोनाच्या संकटात मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकारही भाजपने षडयंत्र रचून पडलं, असा आरोप त्यांनी केला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आमची प्राथमिकता जनतेला मदत करण्याची आहे. परंतु राज्यात निवडलेले सरकार पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे. आमचे सरकार सुशासन देताना आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा गहलोत यांनी केला.

विशेष म्हणजे राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सरकार पाडण्यासंबंधी कथित ऑडिओ समोर आला होता. यात काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांच्याशी पैशांच्या व्यवहाराबाबत बोलणारे जे आहेत तो आवाज गजेंद्रसिंग शेखावत यांचा आहे. यामुळे गजेंद्रसिंग यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी राजस्थान पोलिसांची एसओजी टीम पोहोचली होती. पण त्यांनी नकार दिला, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

या टेप प्रकरणात भाजप नेते संजय जैन यांना एसओजीने अटक केली होती. आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणात अटक झालेल्या संजय जैन यांना जिल्हा कोर्टाने २ दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवले आहे. त्याआधी १८ जुलै रोजी कोर्टाने त्यांना चार दिवसांच्या रिमांडवर पाठविले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post