लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले माफ करा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळातील भरमसाठ सरासरी वीजबिले माफ करावीत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या मराठा आघाडीच्यावतीने देण्यात आला आहे.

यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना आरपीआय मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे, आयुष्य फाऊंडेशनचे जनार्धन जायभाय, उमेश आमटे, सुर्दशन फसले आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यामध्ये म्हंटले आहे की, नगर शहर व परिसरात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चालू असताना मागील तीन महिने सरासरी वीजबिल घेऊन सुद्धा आता अनेक नागरिकांना भरमसाठ बिले पाठवून शॉक दिला आहे. कोरोनाचा संकट काळ चालू असताना अनेक आर्थिक संकटाना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक कुटुंब उपासमारीने उध्वस्त झाली आहेत व त्यातच भरमसाठ वीजबिलांमुळे नागरिक अधिक हैराण झाले आहे.

तरी महावितरणने सरासरी जादाचे वीजबिल माफ करावे व नगर शहर आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या मराठा आघाडीच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. जर महावितरण कंपनीने याबाबत कार्यवाही केली नाही तर शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post