"झेड' सुरक्षेतील नेत्यांनी लोकांत जाऊन विश्वास निर्माण करावा : हायकोर्ट
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली -दिल्लीत सीएएवरून सुरू असलेल्या हिंसाचारात जखमी १४ जणांचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २७ झाली. २५० जखमी आहेत. दरम्यान, किरकोळ प्रकार वगळता बुधवारी दिल्लीत शांतता होती. दिल्ली हायकोर्टाने अगोदर मध्यरात्री आणि नंतर बुधवारी दुपारी ३ तास सुनावणी केली. न्या. मुरलीधर यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने नमूद केले की, ‘दिल्लीत १९८४सारखी स्थिती आम्ही होऊ देणार नाही. यासाठी झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या नेत्यांनीलोकांमध्ये मिसळावे, त्यांच्यात विश्वास निर्माण करावा.’
न्या. मुरलीधर यांची आठवड्यापूर्वीच दिल्लीहून पंजाब-हरियाणा हायकोर्टात बदली झाली आहे. बुधवारी याचे आदेश निघाले. आता ते याप्रकरणी पुढीलसुनावणी करणार नाहीत. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल सुनावणी करतील.
हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट: दिल्लीचे नेते, पोलिसांवर कडक ताशेरे
सुप्रीम कोर्टात शाहीन बाग प्रकरणी सुनावणी झाली. कोर्टाने नमूद केले की, “दिल्ली पोलिसांत व्यावसायिकतेची कमतरता आहे. आम्ही पोलिसांचे स्वातंत्र्य निश्चित करण्यासाठी निर्देश दिले होते. तुम्ही ब्रिटनच्या पोलिसांकडून बोध घ्यायला हवा. कुणी प्रक्षोभक भाषण दिले तर तेथे पाेलिस तत्काळ कारवाई करतात. पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती तर ही समस्याच उद््भवली नसती.’
> मौजपूर, जाफराबाद, कबीर नगर, विजय पार्क भागांत रस्ते निर्मनुष्य असून लोक गल्ली-बोळात गटागटाने उभे होते.
> कबीरनगरमध्ये रुग्णालयांची तावदाने फोडली, काही ठिकाणी आगही लावली. गोकुलपुरीमध्ये दोन गटांत चकमकी सुरू होत्या.
> सीबीएसईने ईशान्य दिल्लीमध्ये ७३ परीक्षा केंद्रांवर इयत्ता बारावीची परीक्षा एका दिवसासाठी लांबणीवर टाकली.
कोर्ट लाइव्ह : जजनी मिश्रांचा व्हिडिओ पाहिला, भाजप नेत्यांवर गुन्हे नोंदवण्याचे दिले आदेश
हायकोर्टाने दिल्ली पोलिसांची बाजू मांडण्यासाठी आलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारले, “कपिल मिश्रा यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिलाय?’
>मेहता : नाही.
> कोर्ट : पोलिसांनी तो पाहिलाय?
> मेहता : दोन व्हिडिओ पाहिलेत, एक नाही पाहिला. (जो पाहिलेला नव्हता तोच व्हिडिओ मिश्रांचा होता.) यानंतर जज मुरलीधर यांनी स्वत: व्हिडिओ लावला. नंतर ते म्हणाले, “मेहताजी, यात पोलिस अधिकारीही आहेत. तुम्ही आता पोलिस आयुक्तांना प्रक्षोभक भाषणे देणारे कपिल मिश्रा,
प्रवेश वर्मा व अनुराग ठाकूर यांच्यावर गुन्हे नोंदवायला सांगा.’
> मेहता : केंद्रालाही पक्षकार करा, कारण कायदा-सुव्यवस्था केंद्राकडेच आहे.
>काेर्ट : नेते आयुक्तांसमोरच असे बोलत असतील तर कारवाई व्हायला नको का?
> अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मांवर कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र, पुरावे सापडले नसल्याचे पोलिसांनी बुधवारी कोर्टात सांगितले.
डोभाल म्हणाले, इन्शाअल्लाह शांतता कायम राहील
एनएसए अजित डोभाल बुधवारी रस्ते-गद्दीबोळांत फिरले. एका मुलीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, इन्शाअल्लाह शांतता कायम राहील.
Post a Comment