माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत नाशिक विभागात 7 लाख 53 हजार 103 शेतकर्यांना 5 हजार 600 कोटी तर अहमदनगर जिल्ह्यात 2 लाख 58 हजार 787 शेतकर्यांना 2 हजार 296 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
सध्या दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ दिला जाणार आहे. आधार प्रमाणीकरणाच्या माध्यमातून त्याची आज खर्या अर्थाने सुरुवात झाली. आज जिल्ह्यातील ब्राह्मणी व जखणगाव गावातील शेतकर्यांच्या याद्या प्रातिनिधीक स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानंतर यादीनुसार शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु करण्यात आले. दिनांक 28 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्वच गावात याद्यांची प्रसिद्धी होऊन आधार प्रमाणीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिली.
या योजनेचा सर्वाधीक लाभ अहमदनगर जिल्ह्याला मिळणार आहे. योजनेचा अंतिम टप्पा सुरु झाला असून महसूल आणि सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयकृत बॅंकांचे अधिकारी-कर्मचारी कर्जमुक्ती योजनेच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत. कोणत्याही शेतकर्यांकडून तक्रार येऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. आधार प्रमाणीकरण अथवा थकीत कर्ज रकमेबाबत कोणाची तक्रार असल्यास ती तालुका किंवा जिल्हा समितीकडे सादर करण्यात येणार असून त्यावर तात्काळ निर्णय घेतला जाणार आहे.
Post a Comment