‘स्वच्छ सर्व्हेक्षणात’ प्रशासनाला हवी नागरिकांच्या सहभागाची जोड – महापौर बाबासाहेब वाकळे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- स्वच्छ सव्हेक्षणात नगर शहर हे देशातील टॉप 50 शहरांमध्ये यावे यासाठी महापालिका प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच महापालिकेचे सर्व नगरसेवक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आपल्या शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत लौकीक वाढावा यासाठी प्रशासनाला नागरिकांच्या सहभागाची जोड आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.

स्वच्छता सर्व्हेक्षणासाठी केंद्राची टिम केव्हाही शहरात दाखल होणार आहे. त्यामुळे सर्वांनीच अलर्ट राहणे आवश्यक आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहूल द्विवेदी यांनी सर्व अधिकारी कर्मचार्‍यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. प्रशासन मन लावून काम करत आहे. परंतु नागरिकांच्या सहभागाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नसते. त्यामुळे नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे म्हटले आहे.

रस्त्यावर कचरा फेकल्यास होणार कारवाई
शहर कचराकुंडी मुक्त करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शहरातील बहुतांश कचराकुंड्या हटविण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकाने घंटागाडीतच आपल्या घरातील व दुकानातील कचरा टाकणे आवश्यक आहे. परंतु काही ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर कचरा न फेकता स्वयंस्फूर्तीने कचरा गाडीतच तो टाकावा व प्रशासनाकडून होणारी कटू कारवाई टाळावी, असे आवाहनही महापौर वाकळे यांनी केले आहे.

स्वयंसेवी संस्थांची बुधवारी बैठक
स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात शहरातील प्रत्येक घटकाला सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापुर्वी सर्व शाळा-महाविद्यालये, महिला बचत गट, विविध संघटना यांच्या बैठका घेऊन आवाहन करण्यात आले आहे तसेच बुधवारी शहरातील स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्वच्छ सर्व्हेक्षणाची माहिती देण्याबरोबरच स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग नोंदविण्यासाठी आवाहन केले जाणार आहे.
Previous Post Next Post