महापालिकेतील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार - आ.संग्राम जगताप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे, परंतु अभियंते व कर्मचार्याची संख्या अपुरी असल्यामुळे नगर शहरातील जनतेला वेळेवर सुविधा देणे शक्य होत नाही, यासाठी शासनाकडून रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच मंजूरी मिळविणार आहे. संख्याबळ कमी असतानाही अधिकारी व कर्मचार्यांमध्ये ही सर्वजण चांगले काम करत आहे. ज्येष्ठ अभियंत्याप्रमाणे तरुण अभियंत्यांनी आपले काम करावे. शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी मनपाच्या अडचणीच्या काळात अनेक प्रसंगाला तोंड देत आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडले. त्यांच्या काळात नगर शहरामध्ये विविध प्रश्न मार्गी लागले. त्याच्या अनुभवाचा उपयोग या पुढील काळात ही व्हावा अशी अपेक्षा आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या सेवापुर्ती व निरोप समारंभानिमित्त अभियंता संघटनेच्या वतीने आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रभारी आयुक्त राहूल द्विवेदी, उपमहापौर मालनताई ढोणे, सभापती मुदस्सर शेख, सभापती लताताई शेळके, उपआयुक्त डॉ. प्रदीप पठारे, सुनील पवार, बाळासाहेब पवार, संजय ढोणे, इंजि. परिमल निकम, डॉ. अनिल बोरगे, सुरेश इथापे, आर. जी. मेहेत्रे, महादेव काकडे, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, गणेश गाडळकर, आर. जी. सातपुते, मेहेर लहारे, शहनाज तडवी, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, अनंत लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभारी आयुक्त राहूल द्विवेदी म्हणाले की, नोकरी करता असताना एकमेकापासून खूप शिकायला मिळते. मनपा आयुक्त पदभाराच्या काळात खूप काही शिकलो. श्री. सोनटक्के शांत स्वभावाचे आहेत. मला उशिरा कळले की सोनटक्के यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. अगोदर समजले असते तर मी त्यांना स्वेच्छानिवृत्ती न घेण्याबाबत आग्रह धरला असता. त्यांच्या सारख्या अधिकाऱ्यांची महापालिकेला गरज आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, मनपाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही अभियंता सोनटक्के यांनी चांगले काम केले. प्रत्येकाने प्रामाणिकपणाने काम केल्यास त्या कामामधून आपल्याला आत्मियता मिळते. मनपामध्ये कमी अधिकारी आहे तरीही सर्वांनी आव्हान स्विकारुन आपले काम प्रामाणिकपणाने पार पाडावे असे ते म्हणाले.
अभियंता विलास सोनटक्के म्हणाले की, मला मनपामध्ये 35 वर्षे काम करीत असताना सर्व प्रशासनाचे, पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. प्रामाणिकपणे मनपामध्ये काम केले. विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. कौटुंबिक कारणास्तव मी स्वच्छासेवानिवृत्ती घेत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, परिमल निकम, सुरेश इथापे, अनंत लोखंडे, बाळासाहेब पवार आदींचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश भालसिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेव काकडे यांनी मानले.
Post a Comment