...जे दुखावले त्यांची माफी मागतो : अजित पवार
माय नगर वेब टीम
मुंबई - शुक्रवारी मी अचानक राजीनामा दिला, त्यातून आमचे पक्षप्रमुख, नेते, कार्यकर्ते यांना सगळ्यांनाच वेदना झाल्या. त्यांना समजलंच नाही की मी राजीनामा का दिला? आता मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो जेव्हा अशी काही वेळ आली तर समजा मी पक्षातल्या लोकांशी बोललो असतो तर त्यांनी मला राजीनामा देऊ नका असंच सांगितलं असतं. ज्यांना मी न सांगता हे केलं त्यांची मी माफी मागतो असं अजित पवार यांनी सांगितलं. मी हरिभाऊ बागडेंना तीन दिवसांपूर्वी एक फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही मुंबईत कधी असणार आहात? आम्ही सगळे शिखर बँकेत संचालक म्हणून काम करत होतो. आता निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्यामुळे ज्यांना वेदना झाल्या त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो.
शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांचा दुरान्वये काहीही संबंध नाही तरीही त्यांचं नाव यामध्ये गोवण्यात आलं. ईडीने शरद पवार यांचं नाव अशासाठी दिलं की अजित पवार संचालक म्हणून कार्यरत होते. माझं आणि शरद पवार यांचं नातं असल्याने ईडीने त्यांचं नाव या प्रकरणात आणलं. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो म्हणूनच राजीनामा दिला असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच निवडणूक जाहीर झाल्यानंतरच हे सगळं समोर का आलं? असाही प्रश्न त्यांनी विचारला. 2010 च्या प्रकरणात 2019 मध्ये गुन्हा का दाखल केला ? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला. तसंच पवार कुटुंबात काहीही कलह नाही, कशाचा गृहकलह? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. तसेच शरद पवारांचा शब्द आमच्या कुटुंबात अंतिम असतो असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मी माझ्या विवेकबुद्धीला स्मरुन राजीनामा दिला असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शिखर बँक प्रकरणात 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. ज्या बँकेच्या ठेवीच 12 हजार कोटीपर्यंत आहेत त्यात एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा होईलच कसा? असाही प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यामुळे याच विषयाची चर्चा सुरु आहे. अजित पवार जेवढे आक्रमक आहेत तेवढेच ते भावूकही आहेत असं जयंत पाटील यांनी सांगितलं. कालपासून अजित पवार नॉट रिचेबल होते. अजित पवार यशवंत राव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील यांचीही अजित पवार यांच्यासोबत उपस्थिती होती.
Post a Comment