माय नगर वेब टीम
अहमदनगर - कुकडी योजनेतून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी साकळाईसाठी दिले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जिल्ह्यासह राज्यातील जनतेने जो विश्वास व्यक्त केला. त्यानंतर साकळाई योजना हे आमचे दायित्व आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर शब्द दिला आहे. साकळाईबाबत कोणतीही अडचण नाही, असा स्पष्ट निर्वाळा राज्याचे गृहनिर्माण राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. तसेच नगर जिल्ह्यात सक्षम नेतृत्व आहे.नेतृत्वासाठी जिल्ह्यास बाहेरच्यांची आवश्यकता नाही.बाहेरचे नेतृत्व नगरकर स्वीकारणार नाहीत. या शब्दात नामोल्लेख न करता ना. विखे-पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्यावर अपरोक्षपणे टीकास्त्र सोडले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गृहनिर्माणमंत्री विखे पाटील यांनी कुकडी, मुळा, वांबोरी चारी, सीना प्रकल्प आदीच्या पाणीवाटपाचा संदर्भातील आढावा बैठक आयोजित केली होती. ही बैठक संपन्न झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक कक्षात गृहनिर्माणमंत्री विखे पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.
विखे पाटील म्हणाले, कुकडी प्रकल्पातील ८० टक्के लाभक्षेत्र नगर जिल्ह्यात आहे. नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि प्रकल्पाचे काम सुविधेने होण्यासाठी या प्रकल्पाचे सर्कल ऑफिस नगर जिल्ह्यात असणे गरजेचे आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील यास ग्रीन सिग्नल दिला आहे. मुळातच कुकडी प्रकल्पातील पाण्याच्या बाबतीत नगरकरांच्या हक्काच्या पाण्यावर नेहमीच गदा आली असून अन्याय झाला. कृष्णा खोऱ्यात समावेश झाला खरा, मात्र प्रकल्प अपूर्ण ठेवून शेवटी अन्यायच केला. जिल्ह्यावर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी आता प्रयत्न करणे, सिंचन प्रकल्प पूर्ण करणे,उद्योगांचा विस्तार करणे हे गरजेचे आहे.जिल्हा विभाजनाच्या मुद्दा संदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले, जिल्हा विभाजनाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे, त्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, मात्र इतरही अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते प्रश्न मार्गी लावणे अधिक महत्त्वाचे आहे.असे विखे पाटील म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांचा धाडसी निर्णय !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरसाठी असलेले ३७० कलम व ३५ अ हे कलम रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आणि धाडसी निर्णय आहे. वन फ्लॅग वन नेशन ही तमाम भारतवर्षातील कोट्यवधी भारतीयांची अनेक वर्षाची मागणी होती. ३७० कलम रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यावधी भारतीयांच्या भावनेचा आदर केला आहे.या निर्णयामुळे आता जम्मू कश्मीर येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. विकासाला गती मिळून उद्योग आणि रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी निर्माण होतील, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
प्रवेशासाठी अनेकजण इच्छुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेकडे लक्ष वेधले असता, विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेस राज्यभर मोठा प्रतिसाद मिळतो आहे. मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा हा प्रतिसाद आहे,अनेक विधानसभा सदस्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी या यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. अनेक जण प्रवेशासाठी इच्छुक आहेत. चांगली माणसं असतील, तर त्यांना प्रवेश दिला जात आहे. हे प्रवेश टप्प्याटप्प्याने होत आहेत. प्रवेशाचे निर्णय पक्ष स्तरावर घेतले जात असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment