माय नगर वेब टीम
पारनेर - राज्यभरात नेतेमंडळी, सेलिब्रिटी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत नागरिकांचा जोश वाढवत आहेत. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे जनआशिर्वाद यात्रेनिमित्त पारनेर तालुक्यात आले होते. दौऱ्या दरम्यान ठाकरे यांच्या हस्ते काळेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. परंतु त्यांचा ताफा टाकळी ढोकेश्वरकडे रवाना होताच झाडच गुडब् झाले !. ठाकरेंनी लावलेले ते झाड गेले कुठे ? कोणी गायब केले ? याबाबत चर्चेचा उधाण आले आहे. ठाकरेंचे वृक्षारोपण हे फक्त फोटोसेशन पुरतेच होते की काय ? असा सवालही नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
राज्यात यंदा ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यांना वृक्षारोपणाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. वनविभाग तसेच अन्य सरकारी विभाग यामध्ये सहभागी झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ११ कोटी ७६ लाख (20 जुलै) रोपांची लागवड करण्यात आली आहे. या मोहिमेत राजकीय नेते मंडळी, सेलिब्रिटी, विविध सामाजिक संस्था, संघटना सहभागी होत आहेत.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जण आशिर्वाद यात्रेनिमित्त नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. दौऱ्या दरम्यान त्यांनी नगरसह पारनेर तालुक्यात ठिक- ठिकाणी वृक्षारोपण केले.
पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे आदित्य यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. झाड जिवंत राहण्यासाठी त्याला पाणीही दिले. परंतु लावलेली झाडे ठाकरे यांचा ताफा टाकळी ढोकेश्वर कडे रवाना होताच, काढून टाकण्यात आली!, ती झाडे कोणी काढली, आणि कुठे गेली याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
झाडे फक्त फोटोसेशन पुरतीच लावण्यात आली होती का ? असा प्रश्न नागरिक व निसर्ग प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. यंदा सप्टेंबर पर्यंत वृक्ष लागवडीस मुदत देण्यात आली असून अश्या दिखाऊ वृक्ष लागवडीने सरकारचे ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय खरच पूर्ण होणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या वृक्षलागवड वेळी ना. विजय औटी यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
फोटोसेशन पुरती वृक्ष लागवड थांबली पाहिजे
वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. सर्वसामान्यांना राजकीय लोक झाडे लावण्यासाठी सांगतात. मात्र हे एक झाड लावताना फोटो काढतात आणि प्रसिद्धी मिळवतात हे कुठे तरी थांबले पाहिजे. असे होत असेल तर त्या वृक्ष लागवडीचा काय उपयोग, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी 'माय नगर'च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
Post a Comment