गुंडाराज संपविण्यासाठी व शहर विकासासाठी विधानसभा लढवणारच- किरण काळे

माय नगर वेब टीम
अहमदनगर: मागील तीस वर्षांपासून शहर विकासापासून वंचित आहे. शहरात “गुंडाराज” असून बेरोजगार तरुण पीढीला आयुष्य उद्ध्वस्त करणारा “गुन्हेगारीचा रोजगार” देण्यात काही नेत्यांना धन्यता वाटते. तर काही “संधीसाधू नेत्यांना” याच राजकीय भांडवल करीत स्वतःची राजकीय पोळी भाजायच पडलेलं असत. अशा प्रवृत्तींमुळे नगरची राज्यभर बदनामी झाली असून याबद्दल सामान्य नगरकरांच्या मनात तीव्र संताप आहे. या नेत्यांना आता जनता वैतागली असून नगरकरांना अपेक्षित असणारा ‘‘सक्षम तिसरा पर्याय’’ देण्यासाठी मी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. दरम्यान याबाबत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन उमेदवारी ची मागणी करणार असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला 54 हजारांचे लीड कसे मिळाले याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शहराच्या विकासासाठी आणि नगरकरांच्या मानगुटीवर बसलेल्या तथाकथित नेत्यांच्या तावडीतून शहराची कायमची सुटका करण्यासाठी नगरकरांचे “ऐतिहासिक जनआंदोलन” उभारून “निर्णायक लढाई” लढणार असल्याचे आणि त्यासाठी काहीही झाले तरी माघार घेणार नसल्याचे यावेळी काळे यांनी स्पष्ट केले.

यावेळी काळे म्हणाले की, शहराच्या सर्वच नेत्यांनी कायम ‘सेटलमेंटच’ राजकारण केल. महानगरपालिका आळीपाळीने वाटून घेत खाल्ली. एमआयडीसी विकसित होऊ दिली नाही. उद्योजकांच शोषण केल. शहरातील नेत्यांनी गुंडांना हाताशी धरून कामगार युनियनच्या माध्यमातून कामगार आणि उद्योजक यांना वेठीस धरल. यामुळे नवीन उद्योग तर आले नाहीच पण आहेत ते अनेक बंद पाडले गेले.

कोणत्याही शहराच्या विकासासाठी एमआयडीसी ही केंद्रस्थानी असते. त्याशिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी शहरातील युवकांना संघटीत करून “जनआंदोलन” उभे करणार असल्याचे, काळे यांनी यावेळी सांगितले.


भाजपला शहरात मिळालेले विक्रमी मताधिक्य आत्मपरीक्षण करायला लावणारे

शहरात पक्षाचे दोन आमदार आहेत. तरी होम ग्राउंडवर आमच्या उमेदवाराची झालेली सुमारे ५४,००० मतांची पीछेहाट ही धोक्याची घंटा आहे. याबाबत सखोल आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. याचा वस्तुनिष्ठ कारणमीमांसा करणारा अहवाल आपण पक्षश्रेष्ठींना भेटून सादर करणार असल्याचे, काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 मी बंडखोरी न केल्यामुळेच जगताप आमदार

मागील विधानसभेला आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यावेळी युवक शहर जिल्हाध्यक्ष पदाची माझ्याकडे धुरा होती. त्या माध्यमातून “लोकसंवाद अभियान” राबवून मी शहर पिंजून काढले होते. माझ्या मागणीला शहरवासीयांनी मोठा प्रतिसाद दिला होता. मात्र पक्षाने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. त्यावेळी मी बंडखोरी केली नाही. चारही पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे जगताप हे अत्यंत थोड्या फरकाने आमदार झाले. मी बंडखोरी केली असती तर जगताप हे कदापि आमदार झाले नसते.


योग्य वेळी ताकद दाखवून देणार

२०१४ च्या निवडणुकी नंतर माझ्या अनेक कार्यकर्त्यांना धमकावले गेले. दहशत करून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. माझ्यावर देखील असे अनेक प्रयोग केले गेले. मात्र मी भिक घातली नाही. मागील साडेचार वर्षात आपण कोणताही जाहीर गाजावाजा न करता शहरात संघटना बांधणीचे काम केले आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी योग्य वेळी शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवून देऊ, असा गर्भित इशारा विरोधकांना यावेळी काळे यांनी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post