शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी, मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना अवकाळीने झोडपलं


माय नगर वेब टीम 

छत्रपती संभाजीनगर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाड्यातील हवामानात बदल झाला आहे. सोमवारी पहाटे मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले. बीडसह अन्य जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते. दरम्यान सोमवारी रात्री धाराशिवमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. उमरगा तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. त्याचा जनजीवनावर परिणाम दिसून आला.


धाराशिव जिल्ह्यात रब्बीची पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. त्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात पुढील २४ तासांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर तालुक्यात रविवारी मध्यरात्री व सोमवारी सकाळी पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात सोमवारी दुपारी चार ते पाचच्या सुमारास गारपीट झाली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारीचे काही प्रमाणात नुकसान झाले. परभणी शहरात गंगाखेड, पालम तालुक्यांतील काही भागात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काढणीला आलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.


सोमवारी सकाळपासून कडक ऊन होते. दुपारी बारानंतर वातावरणात बदल झाल आणि तीनच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील आनंदवाडी, चाटोरी, बोरगाव, बंदरवाडी, खडी, नाव्हा, नाव्हलगाव, कांदलगाव या गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

अनेक राज्यांना अलर्ट

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 10 राज्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. फक्त पाऊसच नाही तर या राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग हा प्रतीसात 30 ते 40 किमी असा असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम, आसाम, मेघालय, तेलंगणा या राज्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post