हंगा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक
माय नगर वेब टीम
पारनेर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर खासदार नीलेश लंके यांनी हंगा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत तीव्र आणि आक्रमक भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीतील अनुभव, ईव्हीएम वाद, गद्दारीचा मुद्दा आणि महायुती सरकारवर हल्लाबोल अशा अनेक मुद्दयांवर त्यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करत उत्साह दिला.
यावेळी बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, शिवाजीराव जाधव, विकास रोहोकले, अशोक रोहोकले, ॲड. राहुल झावरे, सचिन पठारे, बाळासाहेब खिलारी, रवींद्र राजदेव, प्रकाश गाजरे, जितेश सरडे, शिवाजी होळकर, गणेश साठे, अजय लामखडे, बाबासाहेब काळे, पोपटराव पुंड, पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, राजू शेख, योगेश मते, बाळासाहेब नगरे, सुभाष शिंदे, भुषण शेलार, सचिन औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, सचिन पठारे, दादा शेटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण ताकदीने लढवणार आहोत, आणि जिंकणारही आहोत. असे सुरूवातीला ठाम शब्दात खा. लंके म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत सांगितले की आपला विजय निश्चित असला तरी फाजील आत्मविश्वास नको. प्रत्येक मतदारापर्यंत संघटीत पध्दतीने पोहोचा. प्रत्येक बूथ मजबूत करा. कारण मतदार हाच आपला खरा किल्ला आहे. ही लढाई जिंकण्यासाठी आपलीच ताकद पुरेशी असल्याचे ते म्हणाले.
खा. लंके यांनी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळयाची उदाहरणे देत आठवण करून दिली. या छोट्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मॅनेज होणार नाही. परंतु मोठया निवडणुकीत आपण कसा निसटता पराभव पाहिला हे राज्यभर चर्चेत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर गेला. यावरून ईव्हीएम घोटाळयाची गंभीरता लक्षात येते. पण या निवडणुकीत मतपेटीला हात लावता येणार नाही. त्यामुळे आपल्या मेहनतीचा थेट फायदा आपल्यालाच मिळेल असे ते ठामपणे म्हणाले.
खा. लंके यांनी गद्दारांविषयी कठोर शब्दांत हल्लाबोल केला. विधानसभेत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. गद्दारांना उमेदवारी नाही, त्यांना धडा शिकवला जाईल. महाविकास आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण मी बेईमानांना कधीही माफ करणार नाही अशी रोख ठोक भूमिका त्यांनी मांडली.
खा. लंके म्हणाले, काही जण मध्यस्ती घालून चुकलं, माफ करा असा निरोप पाठवत आहेत. पण निष्ठा ही एकदाच सिध्द करायची गोष्ट असते. माझा स्वाभिमानी कार्यकर्ता दुसऱ्याच्या दारात कधीही गेला नाही. नीलेश लंके प्रतिष्ठानचा परिवार सर्व आव्हानांना तोंड देऊ शकतो, म्हणून आम्हाला कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
पारनेर-नगर मतदारसंघातील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्कासाठी लंके यांनी दर सोमवारी पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात दिवसभर उपस्थित राहून जनता दरबार भरवणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ तोडगा काढू. असे त्यांनी जाहीर केले.कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले.
खा. लंके यांनी राज्यातील महायुती सरकारवर कडाडून टीका केली. महायुती सरकारवर जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या सभांना लोक येत नाहीत. दुसरीकडे आपल्या एका मेसेजवर हजारो कार्यकर्ते जमतात, आणि बसायलाही जागा उरत नाही. हीच आपली खरी ताकद, हीच आपली संपत्ती आहे असे त्यांनी सांगितले.
Post a Comment