ओला दुष्काळ, शेतकरी कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक; पालकमंत्र्यांच्या दालनाबाहेर जागरण गोंधळ!



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर - अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, हेक्टरी किमान 1 लाख रुपयांची मदत, गुराढोरांना बाजारभावानुसार नुकसानभरपाई तसेच शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीसाठी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या दालनाबाहेर जागरण गोंधळ आंदोलन केले.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या, गावे पाण्याखाली गेलीत, जनावरे व गुरेढोरे मृत्युमुखी पडली, घरदार, संसारोपयोगी साहित्य तसेच मुलांचे शैक्षणिक साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकर्‍यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली असून येणार्‍या काळात आत्महत्यांचा धोका निर्माण झाला आहे. या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी व शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

 त्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नावर जागरण गोंधळ आंदोलन छेडले. सरकारने पुढील दोन दिवसांत योग्य ती उपाययोजना केली नाही तर मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर गोंधळ घालण्याचा इशारा या आंदोलनादरम्यान देण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश गणपतराव परकाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजी. शाम जरे, पारनेर तालुकाध्यक्ष सचिन काकडे, नगर तालुकाध्यक्ष महेश दानवे, तसेच सुयोग धस, दिलीप वाळुंज, बापू जगताप, अच्युत गाडे, तरटे तात्या, विकास उदगीरे, अंबादास जाधव, संदीप मांडरे, सागर भोस, शंतनु जाधव, अमोल आगलावे, देविदास गवळी, विकास पवार, दिलीप आगलावे, संतोष कोकाटे, सुभाष आगलावे, बालू बोरुडे, धोंडीराम आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post