खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात संसदेत कांद्यासाठी आंदोलन
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी मंगळवारी संसद भवनाच्या मकर द्वारासमोर तीव्र आंदोलन केले. यावेळी खासदारांनी कांद्याच्या माळा गळयात घालून सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केल्या. आंदोलनाचे नेतृत्व खा. सुप्रिया सुळे यांनी केले. शेतकरी कोमात आणि सरकार जोमात अशी टीका करत खासदार नीलेश लंके यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
या आंदोलनात खा. डॉ. अमोल कोल्हे,खा. नीलेश लंके, खा. भास्कर भगरे, राजाभाउ वाजे, बजरंग सोनवणे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर खासदार सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना आंदोलकांचा सूर आक्रोशमय होता. विविध खासदारांनी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर कठोर शब्दात टीका केली.
खासदार नीलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सध्या कांद्याला बाजारात केवळ १० ते १२ रूपये प्रति किलो इतकाच भाव मिळत आहे. तर उत्पादन खर्च १४ ते १५ रूपये प्रतिकिलो आहे. शेतकरी दर किलोमागे तोटाच सहन करत आहे. खा. लंके पुढे म्हणाले, कांदा हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पीक आहे. पण इतके कष्ट करून जर भाव मिळणार नसतील तर शेतकऱ्याला आत्महत्येच्या उंबरठयावर आणणाऱ्या व्यवस्था बदलल्या पाहिजेत. यासाठी आम्ही संसदेत आवाज उठवतोय आणि रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणतोय असे ते म्हणाले.
खा. लंके यांनी कांदा निर्यातबंदीच्या धोरणावरही जोरदार टीका केली. मागील १०-११ वर्षात केंद्र सरकारने २० पेक्षा अधिकदा कांद्याची निर्यात बंदी केली आहे. अशा अनियमित धोरणांमुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी झाली आहे. या धोरणामुळे निर्यातदारही अडचणीत आले असून त्याचा फटका शेतकरी सहन करत असल्याचे लंके म्हणाले.
फक्त कांदाच नव्हे तर दूधाचे दरही घसरले असल्याचे खा. लंके म्हणाले. शेतकऱ्याच्या कोणत्याही उत्पादनाला सन्मानजनक भाव मिळत नाही. त्यामुळे फक्त कांद्यापुरती ही लढाई मर्यादित नाही. हे आंदोलन सगळया शेती व्यवस्थेसाठी आहे. खा. लंके यांच्या मते शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. जर त्यालाच आपला माल विकून तोटयात जावे लागत असेल तर हा देश कोणासाठी चालवला जातो ? आज सरकार जोमात आणि शेतकरी कोमात आहे. हे चित्र बदलणं अत्यावश्यक आहे.
Post a Comment