आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - शहरात महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या कचरा संकलन कामावर लक्ष ठेवण्यासाठी, घंटागाडी वेळेत जाते की नाही, संबंधीत भागातील कचरा उचलला गेला की नाही, यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घराला क्यूआर कोड बसविण्यात येत आहेत. कचरा उचलल्यानंतर कर्मचाऱ्यांना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. या माध्यमातून कचरा संकलन व्यवस्था सुरळीत व पूर्ण क्षमतेने राबवली जाण्यास मदत होणार आहे. शहरात सुमारे ९० हजार घरांवर क्यूआर कोड लावण्यात आले असून काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
शहरात दररोज सुमारे दीडशे टन कचरा जमा होतो. कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेमार्फत घंटागाडीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, शहरात अनेक भागात घंटागाडी पोहचत नसल्याच्या, नियमित आणि वेळेत घंटागाडी येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून आता नागरिकांच्या घराला क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. कचरा उचलण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन न केल्यास संबंधित भागातील कचरा उचलल्याची नोंद होणार नाही. शासनाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत क्यूआर कोड बसविण्याचे काम केले जात आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
स्वच्छ भारत अर्बन २.० अंतर्गत सेवांच्या रिअल टाइम मॉनिटरिंगकरिता डिजिटल व आयसीटी आधारीत माध्यमाचा वापर करण्यावर विशेष महत्व देण्यात आले आहे. शहर स्वच्छतेच्या कामाचे, कचरा संकलनाचे रिअल टाइम देखरेख व सनियंत्रण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित आयसीटी प्रणाली लावण्यात येत आहे. घंटागाडी आली अथवा नाही, कचरा घेतल्या गेला किंवा नाही, शहरातील किती नागरिकांनी कचरा वर्गीकृत किंवा मिश्र दिला अथवा कचरा दिला नाही, याबाबत माहिती मिळणार आहे. कचरा संकलन व्यवस्थेत नियमितता येऊन नागरिकांना वेळेत सुविधा मिळेल, असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला. दरम्यान, केंद्र शासनाच्या संचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आयटीआय लिमिटेड यांच्याद्वारे ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार ही प्रणाली शहरात कार्यान्वित केली जात आहे.
घनकचरा व्यवस्थापनामध्ये पारदर्शिता येणार :
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कचऱ्याची उचल होण्याची त्याक्षणीची माहिती मिळू शकणार आहे. कचरा गाडी आली किंवा नाही, कचरा घेतल्या गेला कि नाही, नागरिकांद्वारे कशा प्रकारचा कचरा म्हणजे विलगीकरण केलेला अथवा मिश्र कचरा दिल्या गेला, घंटागाड्यांचे रूट इत्यादी सर्व माहिती रिअल टाइम स्वरूपामध्ये प्रशासनास उपलब्ध होणार आहे. तसेच, घंटागाड्यांचे रूट मॉनिटरिंग, सफाई कर्मचारी तसेच घंटागाड्यांचे लाईव्ह लोकेशन, ड्युटीवर असताना कर्मचाऱ्यांद्वारे वाया घालवण्यात आलेल्या वेळेबाबत रिपोर्ट, संकलन कर्मचाऱ्यांचे कार्याबाबतचे रिपोर्ट याद्वारे उपलब्ध होणार आहेत.
कचरा न उचलल्यास प्रशासनाला त्वरीत माहिती :
कचरा संकलन करताना घर सुटल्यास प्रशासनास त्वरित माहिती मिळणार आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत. या प्रणालीच्या वापराद्वारे सर्व कर्मचाऱ्याची डिजिटल हजेरी शक्य आहे. तसेच कर्मचाऱ्याचे लाईव्ह लोकेशन व कामाची वेळ या बाबतीचे मॉनिटरिंग शक्य आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढण्यास तसेच सेवांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
Post a Comment