जिरवाजिरवीच्या राजकारणात विखे पटाईत!, लंकेंचा विखेंवर हल्लाबोल, पाच वर्षाचा हिशोब द्या...



जामखेड तालुक्यात स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा झंजावात 

माय अहमदनगर वेब टीम 

जामखेड : खासदार म्हणून विकास कामे करण्याऐवजी खा. डॉ. सुजय विखे हे जिरवाजिरवीच्या राजकारणात पटाईत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला. 

     नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेस जामखेड तालुक्यातील खर्डा येथून प्रारंभ होऊन जामखेड शहरात समारोप झाला. विविध गावांमध्ये नागरीकांशी संवाद साधताना लंके यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर हल्लाबोल केला. आमदार रोहित पवार हे यावेळी उपस्थित होते. 

      लंके म्हणाले, विकास कामे सोडून खा. विखे हे दाळ,साखर वाटत होते. खासदारकीच्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडून विकासाच्या मुद्यावर निवडणूकीला समोरे जाणे त्यांच्याकडून अपेक्षीत आहे. त्यांनी जिल्हयात किती उद्योग आणले ? किती तरूणांच्या हाताला काम दिले ? हे सांगून मते मागावीत. इंग्लिश भाषा येते का म्हणून मला हिणवण्यात काय हाशिल आहे असा सवाल लंके यांनी केला.  

      लंके म्हणाले, मी खासदार होणारच आहे. खासदार झाल्यानंतर विजयाची पहिली सभा जामखेड येथे घेणार असल्याचे सांगत जामखेडला रेल्वे आणू अशी ग्वाही त्यांनी दिली. मला लोक नोट देतात आणि व्होटही देतात असे सांगत जनसंवाद यात्रेदरम्यान शेकडो नागरीकांना आपल्या निवडणूकीसाठी मदत केल्याचे लंके म्हणाले. तुम्हाला  काम करणारा खासदार हवा की इंग्रजी बोलणारा हवा असे सांगत त्यांनी खा. विखे यांना टोला लगावला.  

      यावेळी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, इंग्रजी येत नाही हा प्रचाराचा विषयच होऊ शकत नाही. विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत. कांदा प्रश्‍न लोकसभेत मांडला पाहिजे होता. मात्र कांदा प्रश्‍नावर आवाज न उठविता शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडून देण्यात आले.महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. कांदा, दुधाचे भाव पडले असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. 

      यावेळी दत्तात्रेय वारे, मधुकर राळेभात, विजयसिंह गोलेकर, शहाजीराजे भोसले, राहुल उगले, सुर्यकांत मोरे, संजय वराट, राजेंद्र पवार, राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, वसीम सययद, राहुल बेदमुथा, सुरेश पवार, संदीप गायकवाड, हनुमंत पाटील, सुरेश भोसले, वैजनाथ पोले, कुंडल राळेभात, प्रशांत राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, प्रा. विकी घायतडक, अभय शिंगवी, प्रकाश सदाफुले, रमेश आजबे, सचिन शिंदे, प्रविण उगले, बाबासाहेब उगले, युवराज उगले, बाबासाहेब मगर, भानुदास बोराटे, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, भिमरााव लेंडे पाटील, बप्पा बाळेे, हरिभाउ बेलकर,नय्यूम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

लंके यांच्या निवडणूकीसाठी मदत 

नायगांव येथील माजी सरपंच, वयोवृृध्द शेतकरी व शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते  बाबासाहेब उगले यांनी लंके यांना निवडणूकीच्या खर्चासाठी दहा हजार रूपये दिले. आनंदवाडीचे युवा शेतकरी प्रकाश गीते यांनी ११ हजार, बाभुळगांव खालसाचे पोलीस पाटील अशोक पुराणे यांनी ५ हजार, नंदू उगले, युवराज उगले, महादेव उगले, प्रशांत वारे, शिवाजी ससाणे, रावसाहेब जाधव या युवा शेतकऱ्यांनी यात्रेदरम्यान ५० हजारांची मदत लंके यांच्याकडे सुपूर्द केली. कोंभळी येथील कॉर्नर सभेत 

 रूपचंद्र गांगुर्डे यांनी लंके यांना ५ हजार १०० रुपये मदत दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post