सौ. सविता लांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेविका पुरस्कार जाहीर

  माय अहमदनगर वेब टीम


राज्यातील पाच ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

दि.२२ एप्रिलला हिवरे बाजार येथे होणार वितरण

नगर  तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सविता लांडे गेल्या १८ वर्षांच्या कालावधीत विविध गावांमध्ये राबविलेल्या उपक्रमांची दखल घेत सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांनी त्यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेविका पुरस्कार जाहीर केला आहे. राज्यभरातील ५ ग्रामसेवकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून त्यात सौ.लांडे यांचा समावेश आहे.

सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस अॅड.विकास जाधव, नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे आदींनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ग्रामविकासाची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या आदर्श गाव हिवरे बाजार येथे विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

निंबळक गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सविता लांडे गेल्या १८ वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासात योगदान देत आहेत. पुण्यासारख्या शहरात जन्म झाल्यानंतर संपूर्ण शिक्षण पुण्यामध्येच घेतले. त्यानंतर ग्रामसेवक म्हणून नियुक्ती झाली ती थेट अतिदुर्गम आदिवासी भागात असलेले अकोले तालुक्यातील पेंडशेत गावात. आदिवासी भागात पाच वर्ष ग्रामसेवक म्हणून सेवा देताना सौ. सविता लांडे यांनी आपल्या कार्यातून वेगळाच ठसा निर्माण केला. त्यांच्या कार्याची पद्धत, निर्णयक्षमता, नाविन्यपूर्ण उपक्रमांची संपूर्ण तालुक्यात चर्चा झाली. 

पेंडशेत या अतिदुर्गम भागात निर्मल ग्राम योजना राबविण्यात सौ. सविता लांडे यशस्वी ठरल्या. निर्मल ग्राम पुरस्कार पेंडशेत गावाला मिळवून दिला. अतिशय दुर्गम भागातुन त्यांची बदली झाली ती दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर तालुक्यात. नगर तालुक्यातील धनगरवाडी या गावचा पदभार स्वीकारला आणि गावात विकासाची गंगा सुरू झाली. सौ लांडे यांनी धनगरवाडी येथे विविध नवीन उपक्रम राबविले. त्यामुळे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पर्यावरण विकासरत्न पुरस्कार धनगरवाडी गावाला प्राप्त झाला तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार देखील धनगरवाडी गावाला मिळवून देण्यात सौ. लांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.जेऊर गावात सुमारे सात ते आठ वर्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून लांडे यांनी जबाबदारी पार पाडली.

 नगर तालुक्यातील निंबळक गावचा ग्रामविकास अधिकारी म्हणून सौ. सविता लांडे यांनी पदभार स्वीकारला आहे. दोन महिन्यातच सरपंच सौ. प्रियंका लामखडे व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेत नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या कामांची दखल राज्य पातळीवर काम करणाऱ्या सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांनी घेतली असून राज्य भरातून ५ आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांमध्ये सौ.सविता लांडे यांचा समावेश केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post