पंतप्रधानांमुळे शेवटचा माणूस विकासाच्या प्रवाहात



 लोणी | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देऊन देशातील 42 कोटी लोकांना बँकेशी (Bank) जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याने शेवटचा माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात येवू शकला, असे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. सभासदांच्या सुविधेकरिता प्रवरा सहकारी बँकेच्या शाखांमधून 365 दिवस सुविधा आणि कोविड (Covid) योध्दे म्हणून डॉक्टरांसाठी मेडीप्लस कर्जसुविधा योजनेची घोषणाही त्यांनी केली.

प्रवरा सहकारी बँकेची (Pravara Sahakari Bank) 47 वी अधिमंडळाची सभा चेअरमन अशोकराव म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, चेअरमन नंदू राठी, अशोकराव असावा, व्हा.चेअरमन बापूसाहेब वडितके यांच्यासह संचालक आणि सभासद ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, मागील दोन वर्षे कोव्हीड संकटाला सामोरे जाताना समाज घटक हतबल झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी उचललेल्या धाडसी पावलामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिरावली असल्याकडे लक्ष वेधून केंद्र सरकार या संकटात प्रत्येक समाज घटकाच्या पाठीशी उभे आहे. मात्र राज्य सरकारची कोणतीही मदत समाजापर्यंत पोहोचू शकली नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) आत्तापर्यंत कोणती मदत केली याची श्वेतपत्रिका काढण्याची गरज व्यक्त करुन अडचणीत सापडलेल्या छोट्या व्यावसायिक, दुकानदारांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

प्रवरा सहकारी बँकेने कोव्हीड संकटातही 1 हजार कोटींचे व्यवसायाचे उदिष्ठ पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. थकबाकीचे प्रमाणही कमी झाल्याने सभासदांना लाभांश देण्याबाबत आरबीआयकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासित करतानाच पद्मश्री योजनेत नियमीत कर्जफेड करणार्‍या कर्जदारांसाठी कर्जाची मर्यादा दोन लाख रुपये, डॉक्टरांसाठी रूग्णालयाच्या पायाभूत सुविधांसाठी दिड कोटी रुपयांपर्यंतची मेडीप्लस योजना तसेच शेतकर्‍यांसाठी सोनेतारण कॅशक्रेडीट योजनेची मर्यादा 10 लाख रुपये आणि व्हॅट्सअ‍ॅप बँकींग सुविधा सुरु करण्याचे त्यांनी सुचित केले.

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बँकेने चांगला व्यवसाय केला असला तरी ठेविदार, कर्जदार टिकवून ठेवण्यासाठी अधिक चांगले काम करावे लागेल. जिल्हा बँकांप्रमाणेच शेती कर्जासाठीच्या योजना कार्यान्वित करण्याची सूचना त्यांनी केली. मुख्य कार्यकारी आधिकारी वाडकर यांनी ताळेबंद सादर केला तर संचालक अशोक आसावा यांनी आभार मानले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post