पाकिस्तानात जायचं असतं तर…कलम ३७० पुन्हा लागू होईपर्यंत मरणार नाही : फारूख अब्दुल्ला

माय अहमदनगर वेब टीम

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका मोठ्या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी त्यांनी कलम ३७० वर भाष्य केलं. “जे लोकं आम्हाला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत आहेत त्यांनी एक गोष्ट समजली पाहिजे. आम्हाला पाकिस्तानात जायचं असतं तर आम्ही १९४७ मध्येच गेलो असतो. हा आमचा भारत आहे. परंतु हा महात्मा गांधी यांचा भारत आहे भाजपाचा नाही,” असं फारुख अब्दुल्ला कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले. तसंच जम्मू काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा मिळत नाही तोवर आपण मरणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

“आम्हाला पाकिस्तानात जायचं असतं तर आम्ही १९४७ मध्येच गेलो असतो. त्यावेळी आम्हाला थांबवणारं कोणीही नव्हतं. परंतु आम्ही भारतात राहण्याचा निर्णय घेतला आणि हा देश आमचा आहे. आमचा देश हा महात्मा गांधींचा देश आहे, भाजपाचा नाही,” असंही फारूख अब्दुल्ला म्हणाले.


यावेळी अब्दुल्ला यांनी भाजपा देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला. तसंच भाजपाकडून जम्मू काश्मीरसह लडाखमधील लोकांना खोटी आश्वासनं दिली जात असल्याचंही म्हटलं. “मी आपल्या लोकांना अधिकार पुन्हा मिळवून दिल्याशिवाय मरणार नाही. मी या ठिकाणी लोकांचं काम करण्यासाठी आलो आहे. ज्या दिवशी माझं काम पूर्ण होईल त्या दिवशी मी या ठिकाणाहून निघून जाईन,” असंही अब्दुल्ला म्हणाले.

वर्षभरानंतर बैठक

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या एका वर्षानंतर फारूख अब्दुल्ला यांनी या ठिकाणी पहिली राजकीय बैठक घेतली. फारूख अब्दुल्ला यांच्यासह त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्लादेखील उपस्थित होते. “जम्मू, काश्मीर आणि लडाखला कधी एकमेकांपासून वेगळं केलं जाईल याचा कधी विचारही केला नव्हता. काही कारणास्तव आम्ही पीएजीडीच्या स्थापनेच्या वेळी या क्षेत्रांतील लोकांना सहभागी करून घेऊ शकलो नाही. परंतु आता या ठिकाणी आलो आहोत. कलम ३७०, ३५ ए पुन्हा लागू करण्यासाठी आणि नवा कायदा संपवण्यासाठी पक्षांनी हातमिळवणी केली आहे,” असंही अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post